रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात अर्धा ते एक टक्क्याने कपात करण्याची वेळ आली आहे, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अरविंद पानगढिया यांनी म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षात विकासदर आठ टक्क्यांचा टप्पा ओलांडेल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना आहेत. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षातील तीन तिमाही अद्याप बाकी आहेत. त्यामुळे थोडा धीर धरला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
अर्थ विषयाला वाहिलेल्या एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात अर्धा ते एक टक्क्याने कपात करावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे सांगितले.
आगामी १५ वर्षे तरी दरसाल ८ टक्के ते १० टक्के या दरम्यान चिंरतन रूपात आर्थिक विकास साधता येणे भारताबाबत शक्य दिसते. भारताबाबत सर्व शक्यता उत्तम आहेत आणि सरकारच्या वृद्घीपूरक धोरणांचे त्याला पाठबळ मिळत आहे, असे पानगढिया यांनी काही महिन्यांपूर्वी म्हटले होते.