देशात करोनाचं संकट पसरत असताना आणखी वाईट बातमी आहे. देशातील रोजगाराच्या संधी घटत चालल्या असून, बेरोजगारीत वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या (सीएमआयईई) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालात हे दिसून आलं आहे.

करोना व लॉकडाउनमुळे देशात रोजगारानिर्मितील खिळ बसली होती. जून महिन्यात बेरोजगारी वाढल्याचं आकडेवारीतून दिसून आलं होतं. त्यानंतर जुलैमध्ये रोजगारनिर्मितीचे दिलासादायक आकडे आले होते. मात्र, पुन्हा एकदा रोजगारनिर्मितीत घट होत असल्याचं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीच्या अहवालातून समोर आलं आहे.

देशात जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रोजगारनिर्मिती घटली असून, यामुळे बेरोजगारी वाढली आहे. जुलैमध्ये बेरोजगारीचादर ७.४३ टक्के होता. ऑगस्टमध्ये तो ८.३५ इतका नोंदवण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये शहरांमध्ये बेरोजगारीचा दर ९.८३ टक्के नोंदवण्यात आला आहे. तर ग्रामीण भागात ७.६५ टक्के इतका होता. जुलैमध्ये बेरोजगारीचं प्रमाण शहरात ९.१५ टक्के तर ग्रामीण भागात ६.६ टक्के नोंदवण्यात आलं होतं.

जूनमध्ये हे प्रमाण १२.०२ टक्के इतकं होतं. ग्रामीण भागातही बेरोजगारीचं प्रमाण १०.५२ टक्के होतं. जुलैमध्ये यात काहीशी घट झाली होती. पण, ऑगस्टमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. करोनामुळे देशाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्क्यांनी घसरला आहे. हे चांगले संकेत नसल्याचं अर्थविश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. तर या परिस्थिती हळूहळू सुधारणा होईल, असं काही आर्थिक अहवालात म्हटलं आहे.

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं होतं. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे.