सुधीर जोशी

सप्ताहाची सुरुवात नरमाईने झाली. करोनाबाधितांच्या वाढत्या आकडय़ांनी बाजाराच्या उत्साहाला खीळ बसली. दरम्यान, टाळेबंदी अंशत: उठविल्यानंतरचे जून महिन्याचे भारताच्या उत्पादन व सेवांचे आकडे सकारात्मक आले. वस्तू व सेवा कर संकलन नव्वद हजार कोटींच्या घरात गेले. दुचाकी व चारचाकी वाहनांचे उत्पादन मे महिन्यात २५-३० टक्क्यांनी घसरले होते, पण जूनमध्ये ते सरासरी तीन पटीने वाढले. बँकांच्या ठेवी व कर्ज वितरणातही वाढीचे आकडे आले. करोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नांना यश मिळण्याचे वृत्त आल्याने अमेरिकेच्या भांडवली बाजाराने उसळी घेतली. परिणामी बाजारात नवीन महिन्याच्या १ तारखेपासून पुन्हा उत्साह दिसू लागला.

अ‍ॅक्सिस बँकेच्या संचालक मंडळाने पंधरा हजार कोटींच्या भांडवल उभारणीस मंजुरी दिली. अशाच भांडवल उभारणीची तयारी याआधी आयसीआयसीआय, एचडीएफसी व कोटक महिंद्र बँकेने केली. करोनामुळे वाढू शकणाऱ्या बुडीत कर्जामुळे पर्याप्त भांडवलाचे प्रमाण कायम राखण्यासाठी हे आवश्यकच आहे. खासगी क्षेत्रातील या बँका गुंतवणुकीसाठी कायमच उत्तम ठरल्या आहेत.

आयटीसीलादेखील करोना संकटाचा फटका बसलाच. परंतु गेल्या वर्षांत प्राप्तिकराचा दर कमी झाल्याचा फायदा मिळाल्यामुळे प्रति समभाग नफ्यात वाढ झाली. टाळेबंदीमुळे फायद्यातील सिगारेट विक्रीवर परिणाम झाला. कंपनीच्या आदरातिथ्य व्यवसायावरही परिणाम झाला. त्याची भरपाई तयार खाद्यपदार्थ, धान्याचे पीठ व नवीन सॅनिटाईझर व हॅण्ड वॉशसारख्या उत्पादनातील वाढलेल्या नफ्यातून होईल. कंपनीच्या नवीन लाभांश धोरणामुळे पोर्टफोलियोमध्ये दीर्घ मुदतीसाठी ठेवावा असा हा समभाग लाभांशरूपाने चांगली वार्षिक कमाई करून देतो.

कर्जमुक्त असलेली कण्टेनर कॉर्पोरेशन ही रेल्वेने कण्टेनरची वाहतूक करणारी अग्रगण्य कंपनी आहे. प्रामुख्याने भारत सरकारच्या मालकीच्या असलेल्या या कंपनीत सामान्य गुंतवणूकदारांकडील समभागांचे प्रमाण अत्यल्प (अडीच टक्के ) आहे. जागतिक उद्योगधंद्यातील मंदीचा कंपनीच्या कारभारावर परिणाम झाला. करोना संकटामुळे तो आणखी काही महिने टिकेल. परंतु कंपनीची नफाक्षमता, भारतातील कण्टेनर वाहतुकीमधील मक्तेदारी पाहता या कंपनीचे समभाग योग्य भावात खरेदी करण्याचा चाणाक्षपणा दाखवायला हवा.

सध्याच्या बाजारातील उत्साही वातावरणात खरेदीच्या संधीची वाट बघणाऱ्यांचा हीरमोड होत आहे. अशा वेळी आघाडीच्या कंपन्यांचे भाव रोज वर गेल्यामुळे त्यामध्ये चढय़ा भावात गुंतवणूक करायला भीती वाटते व फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) परिणामामुळे स्वस्तामधले – दोन आकडय़ांत भाव असणारे समभाग घ्यायचा मोह होतो. पण हे टाळले पाहिजे. भांडवली बाजारात गुंतवणूक करताना महाग वाटत असणारे समभाग घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. बाजाराने करोनामुळे होणाऱ्या नुकसानाला गृहीत धरले आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित झालेल्या कुठल्याही नकारात्मक बातमीमुळे बाजार खाली येणार नाही. येत्या काही दिवसांत बाजाराचे लक्ष जागतिक बाजारांचे संकेत व महागाईच्या आकडय़ांकडे राहील.

sudhirjoshi23@gmail.com