मुंबई : देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस अर्थात टीसीएसने चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत ३५,००० नवोदित पदवीधरांना सेवेत सामावून घेतले आहे, यापैकी २० हजार जुलै-सप्टेंबर तिमाहीत नोकरीत दाखल केले गेले असून, २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी जाहीर केलेल्या ४०,००० भरतीचे लक्ष्य कंपनीने जवळपास गाठले आहे. जागतिक मंदीमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारमंदीची होत असलेल्या भाकितांच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी आश्वासक आहे. टीसीएसने मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत ४३,००० नवोदितांना सेवेत नियुक्त केले होते, तर २०२१-२२ आर्थिक वर्षांतील नोकरभरतीची संख्या एक लाखांहून अधिक होती. अन्यत्र चांगल्या संधींमुळे नोकरी सोडणारे आणि गळती जमेस धरल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत टीसीएसच्या कर्मचारी संख्येतील निव्वळ वाढ ९,८४० इतकी असून, ज्यामुळे कंपनीच्या एकूण मनुष्यबळाची संख्या ६,१६,१७१ इतकी झाली आहे. कंपनीने ज्यांना नोकरीसंबंधाने नियुक्ती प्रस्ताव पत्र पाठविली होती, त्या सर्वाना सामावून घेतले असल्याचे टीसीएसचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी स्पष्ट केले. टीसीएसने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ८.४१ टक्के वाढ नोंदवून तो १०,४६५ कोटी रुपयांवर नेला आहे. वर्षांपूर्वीच्या याच तिमाहीत कंपनीने ९,६५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.