मुंबई : जेएसडब्ल्यू एनर्जी आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यामध्ये रायगड जिल्हयातील पेण येथे अक्षय्य ऊर्जा प्रकल्पासंदर्भात गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, जेएसडब्लू एनर्जीचे शिष्टमंडळ व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. जेएसडब्ल्यूच्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. जास्तीतजास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभाग काम करीत असल्याचे सामंत यांनी सांगितले.