नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीची हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया प्रवासी विमान सेवांचा विस्तार करण्यासाठी चालू वर्षांत डिसेंबरमध्ये ताफ्यात ३० नवीन विमानांचा समावेश करणार आहे, अशी माहिती एअर इंडियाने सोमवारी दिली. एअर इंडिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान वाहतूक सेवांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून याचाच एक भाग म्हणून पाच मोठी बोईंग विमाने आणि २५ एअरबस लहान (नॅरो-बॉडी) विमाने ताफ्यात समाविष्ट करणार आहे. कंपनी भाडेतत्त्वावर पुढील १५ महिन्यांच्या कालावधीसाठी ही विमाने घेणार असून त्याबाबत करारावर स्वाक्षरी झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. २०२२ च्या उत्तरार्धापासून सेवेत दाखल होणारी ही नवीन विमाने, एअर इंडियाच्या विमान ताफ्यात २५ टक्क्यांहून अधिक वाढ करतील. टाटा समूहाने एअर इंडियाच्या ताबा घेतल्यानंतर विमान ताफ्याचा हा पहिला मोठा विस्तार आहे. भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांमध्ये २१ एअरबस ए३२० , ४ एअरबस ए३२१ आणि ५ बोईंग विमानांचा समावेश आहे. बोईंग विमाने डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान ताफ्यात सामील होतील. ते भारतातील विविध मोठय़ा शहरांमधून अमेरिकेच्या विविध शहरांसाठी विमान सेवा पुरवतील. सध्या एअर इंडियाच्या ताफ्यात विविध प्रकारची ७० विमाने आहेत. टाटा समूहाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘एअर इंडिया’ विमान कंपनी खरेदीसाठी १८ हजार कोटींची यशस्वी बोली लावली होती. सुमारे सात दशकांनंतर गेल्यावर्षी ‘महाराजा’ची टाटा समूहाकडे घरवापसी झाली़. कर्जजर्जर झालेल्या ‘एअर इंडिया’ची मालकी पुन्हा मिळवताना टाटा समूहाने गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. टाटा समूहाकडे तीन कंपन्या टाटा समूहाकडे सध्या विमान कंपन्यांची मालकी. टाटा समूहाच्या ताफ्यात ‘एअर इंडिया’, ‘एअर एशिया’ आणि ‘विस्तारा’ या कंपन्यांचा समावेश आहे. आता ‘एअर इंडिया’चे पुनरुज्जीवन करून टाटा समूहाने ‘एअर इंडिया’ची विस्तार योजना आखली आहे.