सरकारची अंतिम परवानगी मिळाल्यावर बजाजतर्फे ‘आरइ- ६०’ ही क्वाड्रासायकल बाजारात आणली जाऊ शकेल असे नमूद करतानाच, इतर काही वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्यालाही क्वाड्रासायकल तयार करून बाजारात आणण्यास पुरेसा अवधी मिळावा यासाठी ही परवानगी दोन-तीन वर्षे पुढे ढकलले जाऊ शकेल, अशी साशंकता बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केली. देशात नावीन्यपूर्ण कल्पना आणणे डोईजडच ठरत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘क्वाड्रासायकल’ (चारचाकी रिक्षा) बनवणारी बजाज ऑटो ही देशातील एकमेव कंपनी आहे. इतर कंपन्यांनी क्वाड्रासायकल बनवेपर्यंत बजाजनेही ती बाजारात आणण्यासाठी थांबावे, ही अस्सल स्पर्धा नसल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी त्यांच्यासोबत ‘कमर्शिअल व्हेइकल्स’ विभागाचे अध्यक्ष रमेश माहेश्वरी उपस्थित होते.
‘बजाज ऑटो’ने तीन चाकी रिक्षांच्या ‘आरइ काँपॅक्ट’ या सुधारित श्रेणीचे बुधवारी अनावरण केले. आरइ काँपॅक्ट श्रेणीतील टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक रिक्षांच्या पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या आवृत्त्या सादर करण्यात आल्या असून या श्रेणीतील डिझेलवर चालणारी रिक्षा ६ महिन्यांत बाजारात येऊ शकेल. या नव्या श्रेणीतील रिक्षा इंधन बचतीसाठी अधिक उपयुक्त असून यामुळे रिक्षा मालकांची दरवर्षी २० हजार रुपयांची बचत होणार असल्याचे माहेश्वरी यांनी सांगितले. तसेच रिक्षाने १० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतरच तेल बदलावे लागत असल्यामुळे तेलाच्या खर्चातही बचत होणार असल्याचे ते म्हणाले. राजीव बजाज म्हणाले, ‘आरइ काँपॅक्ट श्रेणीतील टू स्ट्रोक रिक्षाचे वितरण सुरू करण्यात आले असून फोर स्ट्रोक रिक्षाचे वितरण लवकरच सुरू होईल. तर डिझेल रिक्षा येत्या सहा महिन्यात बाजारात येईल. त्यानंतर तीनचाकी वाहनांतील मध्यम आकाराची ‘ऑप्टिमा’ आणि मोठय़ा आकाराची ‘मॅग्झिमा’ ही वाहने कंपनीतर्फे बाजारात आणली जातील. तीनचाकी वाहनांच्या निर्यातीसाठी श्रीलंका हा महत्त्वाचा देश आहे. कंपनीची ७ हजार तीनचाकी वाहने दर महिन्याला श्रीलंकेत निर्यात केली जातात. त्याखालोखाल इजिप्त, नायजेरिया आणि पेरू या देशांतही निर्यात केली जाते.