नवी दिल्ली : देशांतर्गत हवाई वाहतूक भाडय़ांवरील मर्यादा ३१ ऑगस्टपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. सुमारे २७ महिन्यांच्या कालावधीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले. विमानाच्या इंधनाची दैनंदिन मागणी आणि किमतींचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर हवाई वाहतूक भाडे मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना महासाथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हवाई वाहतूक क्षेत्रात स्थैर्य आले असून नजीकच्या भविष्यात हे क्षेत्र देशांतर्गत वाहतुकीच्या वाढीसाठी सज्ज आहे, असे हवाई वाहतूकमंत्री ज्योतिर्दित्य शिंदे यांनी सांगितले. विमानाच्या इंधनाची किंमत गेल्या काही आठवडय़ापासून कमी झाली आहे. २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या रशिया- युक्रेन युद्धामुळे विमान इंधनाच्या किमती गेल्या आठवडय़ात विक्रमी पातळीवर खाली आल्या आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.