नवी दिल्ली: नागरी सहकारी बँकांनी समांतर विकासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून स्पर्धात्मक राहण्यासाठी कर्मचारी वर्गात तरुण प्रतिभावंतांना सामावून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आधुनिक बँकिंग पद्धतीचा अवलंबणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांसोबत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सहकारी बँकांनी संरचनात्मक बदल, मानवी संसाधनांचे बळकटीकरण, लेखा प्रक्रियेचे संगणकीकरण, अतिरिक्त निधी हाताळण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती आणि इतर महत्त्वाच्या सुधारणा करणे आवश्यक आहे. बँकांनी काळाची गरज ओळखून आवश्यक पावले उचलल्यास ग्राहकांकडूनदेखील बँकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकेल. देशात सहकारी बँकिंग क्षेत्राचा विस्तार मोठा असून सध्या १,५३४ नागरी सहकारी बँका, ५४ शेडय़ुल्ड नागरी सहकारी बँका, ३५ बहुराज्य सहकारी बँका, ५८० बहुराज्यीय सहकारी पतसंस्था आणि २२ राज्य सहकारी बँका कार्यरत आहेत. सहकारी क्षेत्रातील बँकिंग जाळे देशभर विस्तारले असले तरी त्यांचा समांतर विकास झालेला नाही. सहकारी क्षेत्रातील बँका समाजातील तळागाळातील लोकांना कर्ज देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. यामुळे देशातील प्रत्येक गावात किमान एक तरी नागरी सहकारी बँकेची स्थापना करण्याची गरज आहे. याबाबत शहा यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीला (नॅफकब) लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.