बँकांकडून घेतलेले कर्ज कंपन्यांना परत करावे लागत असल्याने आपले हितसंबंध जोपासण्याच्या हेतूनेच गव्हर्नर राजन यांना रिझव्‍‌र्ह बँकेतून घालविण्याचा प्रकार सुरू असल्याचे गंभीर वक्तव्य माहिती तंत्रज्ञान व गुंतवणूक निधी क्षेत्रातील प्रसिद्ध टी. व्ही. मोहनदास पै यांनी केले आहे. राजन यांना घालविण्यासाठी भांडवलदारांचाच आग्रह आहे, असे इन्फोसिसचे एक संस्थापक राहिलेले पै यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून राजन हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व्यक्तिमत्त्व असून आतापर्यंत त्यांनी जाहीर केलेल्या विभिन्न मतांना आर्थिक-वित्तीय क्षेत्रातूनही पसंती मिळाली आहे, असे पै म्हणाले.
पै म्हणाले की, वाढत्या कर्जाचा भार असलेल्या बँकांना मार्च २०१७ पर्यंत त्यांचा ताळेबंद स्वच्छ करण्यास सांगण्यात आले आहे. त्या दिशेने टाकावयाचे पाऊल म्हणून बँकांही कर्जवसुलीसाठी आता वेग घेत आहेत. बँकांना यापूर्वी कर्जदार काही प्रमाणात रक्कम परत करतील अशी आशा होती. मात्र कर्जदारांकडून एखाद्याच बँकेचे आणि तेही कमी प्रमाणात कर्जफेड होत असल्याने बँकांही आता सरसकट कर्जदारांच्या मागे लागल्या आहेत. यामुळेच काही कर्जदार अस्वस्थ झाले असून अशा प्रवृत्तींनाच राजन नको आहेत, असे मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सव्‍‌र्हिसेसचे अध्यक्ष असलेले पै म्हणाले.