भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य ठेवणारे बजेट असल्याचे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी १६ पॉइंट्सचा अॅक्शन प्लान त्यांनी बजेट मांडताना जाहीर केला. पडिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी सौरउर्जेचा वापर करावा ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळू शकेल असे त्या म्हणाल्या.

शेतकऱ्यांचे बजेट मांडताना सीतारामन यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे तसेच ६.११ कोटी शेतकऱ्यांसाठी विमा योजनेचा लाभ होत असल्याचे सांगितले. पंतप्रधान कृषी विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ होत आहे असे त्या म्हणाल्या. अन्न दात्याला ऊर्जादाता बनवण्यावर भर देणार असल्याचे सांगताना कृषी क्षेत्रासाठी मार्केटिंग-प्रोसेसिंगवर भर देणार असे त्या म्हणाल्या. २० लाख शेतकऱ्यांसाठी सोलार पंप योजना त्यांनी जाहीर केली आहे.

आणखी वाचा – Budget 2020 : शेतकऱ्यांचा माल जाणार आता रेल्वेच्या एसी डब्यातून

शेतजमिनीचा चांगला वापर करून अधिक उत्पन्न कसं घेता येईल, यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंकटात असलेल्या १०० जिल्ह्यांना सहाय्य देणार व त्यांच्यासाठी खास योजना असेल असे सीतारामन म्हणाल्या. कृषी क्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.