नवी दिल्ली : हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या १८,००० कोटी रुपयांच्या मोबदल्यात टाटा सन्सला विक्रीच्या ‘समभाग खरेदी दस्ता’वर सरकारकडून सोमवारी स्वाक्षरी करण्यात आली. चालू महिन्याच्या सुरुवातीला टाटा समूहातील टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एअर इंडियासाठी बोलीवर केंद्राने मंजुरी मोहोर उमटवली आहे. २,७०० कोटी रुपये रोखीत आणि एअर इंडियावरील कर्जदायित्वापैकी १५,३०० कोटी रुपये असा एकूण १८,००० कोटी रुपयांचा मोबदला मोजणाऱ्या बोलीला सरकारने देकार दिला. त्यानंतर ११ ऑक्टोबरला एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा सरकार टाटा समूहाला विकत असल्याचे इरादा पत्र जारी करण्यात आले. सोमवारी झालेल्या समभाग खरेदी दस्तावर एअर इंडियाचे संचालक (वित्त) विनोद  हेजमाडी, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव सत्येंद्र मिश्रा आणि टाटा समूहाच्या वतीने सुप्रकाश मुखोपाध्याय यांनी स्वाक्षरी केली. डिसेंबरअखेरीस एअर इंडियाच्या टाटा समूहाकडे हस्तांतरणापूर्वी अनेक नियामक सोपस्कार पूर्ण करावे लागणार असून, भारतीय स्पर्धा आयोगाची (सीसीआय) मंजुरी मिळविणे आवश्यक ठरणार आहे.