नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत दोन कोटींहून अधिक करदात्यांना १.९२ लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने बुधवारी दिली. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी (कर निर्धारण वर्ष २०२१-२२) १.८४ कोटी करदात्यांना दिलेल्या ३७,९६१.१९ कोटी रुपयांचा परतावादेखील समाविष्ट आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेअंतर्गत १ एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ पर्यंत २.२४ करदात्यांना १,९२,११९ कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला गेला आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली. आतापर्यंत ७०,३७३ कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा वितरित करण्यात आला असून कंपनी कराच्या बाबतीत १.२१ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. सीबीडीटीने आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये करदात्यांना १.२२ लाख कोटी, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये १.६२ लाख कोटी, २०१७-१८ मध्ये १.५१ लाख कोटी आणि २०१८-१९ मध्ये १.५ लाख कोटी रुपये प्राप्तिकराचा परतावा वितरित केल होता. करदात्यांची संख्या ८.२२ कोटींवर आर्थिक वर्ष २०२० नुसार भारतातील करदात्यांची संख्या ८.२२ कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये कंपनी आणि वैयक्तिक करदात्यांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. कर निर्धारण वर्ष २०२०-२१ वर्षांसाठी एकूण करदात्यांची संख्या ८,२२,८३,४०७ आहे. तर १ मार्च २०२१ पर्यंत देशाची अंदाजे एकूण लोकसंख्या १३६.३० कोटी इतकी आहे.