नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये चालू खात्यावरील तूट वाढली असून ती सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्के नोंदवली गेली आहे. त्याआधीच्या वर्षांत म्हणजेच २०२०-२१ मध्ये मात्र करोनाकाळात संपूर्ण जग टाळेबंदीत असल्याने आयात कमी झाल्याने चालू खात्यावर तुटीऐवजी जीडीपीच्या तुलनेत ०.९ टक्के आधिक्य होते. तिमाही आधारावरही व्यापार तुटीत मोठी घसरण झाली आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान ती १३.४ अब्ज डॉलर राहिली असून सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात ती १.५ टक्के नोंदविण्यात आली आहे. त्याआधीच्या डिसेंबर तिमाहीमध्ये मात्र ती जीडीपीच्या प्रमाणात २.६ टक्क्यांसह २२.२ अब्ज डॉलर होती. ठरावीक कालावधीत देशाने केलेली वस्तू आणि सेवांची आयात आणि निर्यात यातील तफावत म्हणजे चालू खात्यावरील तूट असते. भारताच्या बाबतीत वस्तूंची आयात ही निर्यातीपेक्षा बहुतांश वेळा अधिक असल्याने हे प्रमाण कायम तुटीचेच असते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये शुद्ध आयात-निर्यात व्यापारातील तूट १८९.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्याआधीच्या वर्षांत ती १०२.२ अब्ज डॉलर राहिली होती. इंधनाचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यामुळे व्यापार तूट यंदा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. व्यवहार समतोलाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ६१८.६ अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली. तर त्याआधीच्या वर्षांत ती ३९८.५ अब्ज डॉलर होती, ज्यामुळे व्यापार तूट मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.