मुंबई : महागाईचा आगडोंब आणि शेअर बाजारात अस्थिरता असताना, गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाचा दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) माध्यमातून विविध फंडांमध्ये १२,६९३ कोटी रुपयांची सरलेल्या ऑगस्टमध्ये भर पडली. ही मासिक आधारावर ‘एसआयपी’मध्ये झालेली आतापर्यंतची उच्चांकी गुंतवणूक आहे. ही आकडेवारी म्हणजे शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या ‘एसआयपी’ सुविधेच्या वापरावरील गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने (अॅम्फी) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून आले. ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडांतील ओघ उत्तरोत्तर वाढतच असून, मे महिन्यापासून या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ हा दरमहा १२,००० कोटींच्या वर कायम आहे. जुलैमध्ये १२,१४० कोटी रुपये, जूनमध्ये १२,२७६ कोटी रुपये, मेमध्ये १२,२८६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर त्या आधी, एप्रिलमध्ये ११,८६३ कोटी रुपयांचा ओघ राहिला. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पाच महिन्यांत म्युच्युअल फंडामध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून ६१,२५८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ या संपूर्ण वर्षांत या माध्यमातून १.२४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली होती. एसआयपी व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ही मार्च २०२२ अखेर असलेल्या ५.७६ लाख कोटींवरून वाढून ऑगस्टअखेरीस ६.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षांत, एसआयपीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वार्षिक ३० टक्के दराने वाढ झाली आहे. एसआयपीच्या खात्यांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत असून विशेषत: किरकोळ गुंतवणूकदार आणि पगारदारांसाठी गुंतवणुकीचा सुलभ व सोयीस्कर मार्ग बनला आहे. गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांबद्दल विचार करण्याची गरज राहत नाही. त्यांना दर महिन्याला टप्प्याटप्प्याने होणारी ही गुंतवणूक असल्याने, भांडवली बाजारात होणाऱ्या चढ-उतारांचा फायदा मिळून सरासरी किमतीला गुंतवणूक होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकांना बचत करण्याची चांगली सवय लागते. विशेषत: तरुण पिढीत बचतीच्या शिस्तीसाठी हे उपयुक्त साधन आहे, असे मत वित्त कंपनी नियोचे रणनीतीप्रमुख स्वप्निल भास्कर यांनी व्यक्त केले.