मोदी सरकारने सरकारी कंपन्यांच्या कारभारात ठोस सुधारणा घडवून आणल्यास या कंपन्यांचे समभाग मूल्य येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये ३० टक्क्यांनी उंचावेल, अशी ंआशा मॉर्गन स्टॅन्लेने व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या या आघाडीच्या दलाल पेढीने यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेल्या कामगिरीचा दाखला दिला आहे.
मॉर्गन स्टॅन्लेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, विविध कारणांनी सार्वजनिक कंपन्यांचे समभाग मूल्य सध्याच ३० टक्क्य़ांपर्यंत खालावले आहे. कंपन्यांचे समभाग मूल्य कमी होण्यात राजकीय हस्तक्षेपाचाही अडसर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोल इंडिया, पॉवरग्रिड, भारत पेट्रोलियम, एनटीपीसी, ओएनजीसीसारख्या सरकारी कंपन्यांना आगामी कालावधीत अधिक भाव मिळू शकतो, असे नमूद करत मोदी सरकारने या कंपन्यांसाठी गुजरात मॉडेल राबवावे, असा आग्रह धरला आहे. असे केल्यास येत्या तीन ते पाच वर्षांत अनेक सरकारी कंपन्या मूल्याबाबत आघाडीवर असतील, असेही अहवालात म्हटले आहे.
मोदी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत गुजरात शासनाच्या अखत्यारीतील कंपन्यांच्या समभागावरील मिळकत १० वर्षांत ३० टक्क्यांनी वाढली होती, असे नमूद करत मॉर्गन स्टेनलेने गुजरात मॉडेल आता केंद्र सरकारच्या कंपन्यांबाबत राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कोल इंडियाला मिळालेल्या प्रतिसादावरून मोदी यांचे गुजरात मॉडेल अन्य सरकारी कंपन्यांना लागू करता येईल, असे अहवालात उदाहरणासह सांगण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत औद्योगिक वाढही पूर्वपदावर येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.