किरकोळ किमतींवर आधारित महागाई निर्देशांकाने सरलेल्या नोव्हेंबरमध्ये ११.२४% असा गाठलेला नऊमाही उच्चांक पाहता, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडून सलग तिसऱ्यांदा किमान पाव टक्के रेपो दर वाढविला जाणे अटळ दिसते, असा विश्लेषक व दलाल पेढय़ांचा कयास आहे. डॉ. राजन नेमके काय करतात हे येत्या १८ डिसेंबरच्या नियोजित मध्य-तिमाही पतधोरण आढाव्यातून दिसून येईल. तथापि सोमवारी जाहीर होणारा घाऊक किमतींवर महागाई दरदेखील ७.१ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचे कयास बांधले जात आहेत.
विश्लेषक काय म्हणतात?
एचएसबीसी
‘‘देशाचा विकासपथ स्थिरावत असल्याचे दिसत असले तरी वाढीचे संकेत मामुली आहेत. मध्यवर्ती बँकेची प्रमुख चिंता ही महागाईवर नियंत्रणाची असून, तिचे भयावह रूप पाहता पुढील आठवडय़ात पाव टक्क्यांनी व्याजदर वाढीचे पाऊल टाकले जाणे अपरिहार्य दिसते.’’
भारतीय स्टेट बँक अर्थ विभाग
ताज्या आकडेवारीच्या भयावहतेकडे कानाडोळा करणे रिझव्‍‌र्ह बँकेसाठी खूपच अवघड ठरेल. महागाईचा कळस तसेच औद्योगिक विकास संकोचत जाणे हा अर्थव्यवस्थेवरील दुहेरी आघातच आहे.
 बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच
‘‘१८ डिसेंबरला पुन्हा ०.२५ टक्क्याची दरवाढ ही आता काळ्या दगडावरची रेषच बनली आहे. बरोबरीने रिझव्‍‌र्ह बँकेने ‘एमएसएफ’संबंधाने बँकांवरील भार हलका करता येईल का हे जरूर पाहायला हवे. आवश्यक रोकड “सुलभतेसाठी रेपोची खिडकी बंद झाल्यास बँकांसाठी शिल्लक राहणारा हाच एक पर्याय आहे.’’
महागाई दरात चढ आणि औद्योगिक उत्पादनाला ओहोटीच्या आकडेवारीने  आश्चर्याचा धक्काच दिला आहे. सद्यस्थिती खूपच बेचैन करणारी आणि कष्टदायी निश्चितच आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही आकडे पुढे येतील. ते पाहूनच आम्हाला पतधोरणाची आखणी करावी लागेल.”    
 डॉ. रघुराम राजन, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर