पेटीएम ही कंपनी गुरुवारी भारतीय शेअर बाजारामध्ये लिस्टेड कंपन्यांपैकी एख झाली. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या मंचावरुन आपलं म्हणणं मांडताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक विजय शेखर शर्मा फारच भावूक झाल्याचं पहायला मिळालं. पेटीएमच्या लिस्टींग समारंभामध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजू लागल्यानंतर विजय शेखर शर्मांच्या डोळ्यात पाणी आलं.

हे फोटो पाहून थक्क व्हाल >> महिना १० हजार पगारामुळे लग्न रखडलेला तरुण ते १७ हजार कोटींचा मालक; Paytm च्या सीईओंचा प्रेरणादायी प्रवास

हिंदीमध्ये भाषण देताना विजय यांनी आपल्या कानावर राष्ट्रगीताचं संगीत पडलं अन् रडू आलं असं प्रांजळपणे कबूल केलं. “तुम्ही राष्ट्रगीत लावलं म्हणून मला हे असं झालं. भारत भाग्य विधाता शब्द ऐकून मला फार आनंद झाला,” असं डोळे पुसतच विजय यांनी सांगितलं. भारत भाग्य विधाता हे शब्द माझ्यासाठी आणि आमच्या कंपनीच्या शेअर्स होल्डर्ससाठी फार महत्वाचे आहे. हे शब्द जेव्हा मी ऐकतो तेव्हा डोळ्यातून पाणी येतं असं त्यांनी यावेळी म्हटलं. डोळे पुसतानाच त्यांनी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्याचा हा दिवस किती महत्वाचा आहे याबद्दल त्यांनी भाष्य केलं. एवढ्या मोठ्या किंमतीमध्ये तुम्ही शेअर्सच्या माध्यमातून भांडवल कसं उभं करणार?, असा प्रश्न मला अनेकांनी विचारलेला. त्यावर मी किंमतीसाठी नाही तर एका धोरणानुसार पैसे उभे करत आहे, असं सांगायचो, अशी आठवण त्यांनी भाषणादरम्यान सांगितली.

नक्की वाचा >> Paytm Shares नं छोट्या गुंतवणूकदारांना रडवलं; शेअर्स तब्बल २६ टक्क्यांनी गडगडले

एकीकडे विजय शेखर शर्मा यांनी कंपनीसाठी हा दिवस किती महत्वाचा आहे हे सांगितलं असताना दुसरीकडे शेअर बाजारामध्ये पेटीएम शेअर्सच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार करणाऱ्यांना आज मोठा फटका बसलाय. ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या विक्रमी १८,३०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) एका आठवड्यामध्येच कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल २६ टक्क्यांनी पडली. यामुळे लहान-मोठ्या सर्वच गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. शॉर्ट टर्मसाठी या शेअर्सच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करणाऱ्या अनेक छोट्या गुंतवणूकदारांची यामुळे मोठी निराशा झालीय.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आज पेटीएमचा शेअर १,९५० रुपयांना एक या प्रमाणे ट्रेड करत होता. शेअर्स इश्यू करण्यात आले त्यापेक्षा ही रक्कम ९.३ टक्क्यांनी घसरलीय. आयपीओच्या माध्यमातून शेअर्सची विक्री झाली तेव्हा प्रत्येक शेअर २१५० रुपयांना विकला गेला होता. आजच्या व्यवहारांमध्ये शेअर्सच्या किंमतीत आणखीन पडझड होऊन इंट्रा डे लो स्तरावर शेअर्स पोहचले तेव्हा एका शेअरची किंमत १ हजार ५८६ रुपये इतकी होती.