मुंबई : नऊ दशकांचा वारसा लाभलेल्या लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा व्यवसाय परवाना रद्दबातल करणारा आदेश गुरुवारी रिझव्र्ह बँकेने काढला. पुरेशा भांडवलाचा अभाव आणि ठेवीदारांचा पैसा पूर्णपणे परत करता येईल इतकीही बँकेची आर्थिक स्थिती नाही, असे त्यासाठी कारण देण्यात आले आहे. सोलापूरमध्ये मुख्यालय आणि एकूण पाच शाखांसह आसपासच्या तालुक्यात लक्ष्मी बँकेचे कार्यक्षेत्र राहिले आहे. रिझव्र्ह बँकेकडून परवाना रद्दबातल केला गेल्यानंतर, गुरुवारची कामकाजाची वेळ संपल्यासरशी या बँकेला कोणताही बँकिंग व्यवसाय करता येणार नाही. १४ सप्टेंबर २०२२ रोजी काढल्या गेलेल्या आदेशाद्वारे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे, असे रिझव्र्ह बँकेने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. राज्याचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक यांना बँकेचा व्यवसाय गुंडाळण्याचे आदेश जारी करण्याचे आणि बँकेसाठी अवसायक नियुक्त करण्यास रिझव्र्ह बँकेने याच आदेशात सूचित केले आहे. ९९ टक्के ठेवीदारांना संपूर्ण भरपाई बँकेनेच सादर केल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ९९ टक्के ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण ठेव परत मिळविता येणार आहे. ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) १९३.६८ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, बँकेच्या ३६० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. बँकेतील कमाल पाच लाख रुपयांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या ठेवींना विम्याचे संरक्षण प्राप्त आहे.