जवळपास आटलेल्या सरकारी तसेच खासगी भांडवली गुंतवणुकीबाबत चिंता व्यक्त रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हा भारताच्या अर्थवृद्धीतील सर्वात मोठा अडसर असल्याचे येथे बोलताना प्रतिपादन केले.

भारताच्या आर्थिक क्षमतांचा पुरेपूर प्रत्यय यावयाचा झाला तर अत्यंत क्षीण बनलेली भांडवली गुंतवणुकीला चालना मिळायला हवी. सध्या अनेक उद्योगांमध्ये त्यांचे उत्पादन प्रकल्प स्थापित क्षमतेच्या ३० टक्केही उत्पादन घेत नाहीत. खासगी कंपन्यांना नव्याने गुंतवणुकीचा कोणताही मानस दिसत नाही, असा चिंतातून सूर राजन यांनी येथे एका उद्योग मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. खासगी गुंतवणुकीसह, सार्वजनिक व सरकारची गुंतवणूकही संथ व रोडावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या देशाच्या आर्थिक विकासदराचे लक्ष्य हे आधीच्या ७.६ टक्के अंदाजावरून ७.४ टक्क्य़ांवर खाली आणले आहे. सरकारकडून निश्चित केल्या गेलेल्या ८ ते ८.५ टक्क्य़ांच्या अंदाजाच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. परंतु सुधारीत विकासदरही चीनच्या आर्थिक वृद्धीदरापेक्षा सरस असण्याचे कयास आहेत.
सद्यस्थिती फारशी उत्साहवर्धक नसली तरी पायाभूत सोयीसुविधांच्या विकासातून आणि विदेशातून होत असलेल्या गुंतवणुकीतून देशातील खासगी क्षेत्राचे गुंतवणुकीचे मन बनू शकेल, असा आशावादही राजन यांनी व्यक्त केला.