मुंबई : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) प्रणाली सुरू झाल्यानंतर जवळपास सहा वर्षांनंतर, त्यावर बेतलेली नवीन सेवा देशातील ४० कोटींहून अधिक प्राथमिक वैशिष्टय़े असणाऱ्या फोन वापरकर्त्यांना डिजिटल व्यवहारांच्या व्यासपीठावर प्रवेश करण्यास सक्षम करेल, असा विश्वास रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी या सेवेचे अनावरण करताना व्यक्त केला. यूपीआयची बहुआयामी वैशिष्टय़े ही सध्या केवळ स्मार्टफोन्सवर उपलब्ध आहेत आणि समाजातील खालच्या स्तरातील, विशेषत: ग्रामीण भागातील लोक, जरी स्मार्टफोन स्वस्त झाले असल्याचे सांगितले जात असले तरी या डिजिटल देयक सेवेचा लाभ घेऊ शकत नाहीत, असे दास यांनी सांगितले. नवीन ‘यूपीआय १२३ पे’चे अनावरण केल्याने यूपीआयअंतर्गत सुविधांना सर्वसमावेशी रूप येऊन, त्या आता आजवर डिजिटल देयक सुविधांपासून वंचित राहिलेल्या समाजघटकांना उपलब्ध होत आहेत. अशा प्रकारे, यातून आपल्या अर्थव्यवस्थेत आर्थिक समावेशनाला मोठय़ा प्रमाणावर चालना मिळणार आहे, असे दास या अनावरणप्रसंगी म्हणाले. मध्यवर्ती बँक मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि रिझव्र्ह बँकेचे अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, या सुविधेला दिले गेलेले नामाभिधान हे देयक व्यवहार सुरू करण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन-पायऱ्यांतील प्रक्रियेतून दिले गेले आहे. ‘यूपीआय १२३ पे’ सुविधा यूएसएसडी ही मोबाइल सेवा प्रदात्यांद्वारे नियंत्रित केलेली संप्रेषण सेवा वापरात आणते. ही अत्यंत किफायती आणि वापरकर्त्यांच्या सिम कार्डमध्ये प्रवेश न करता मोबाइल वित्तीय सेवा प्रदान करण्यासाठी विकसित झालेल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा ठरते. विशेषत: जिचा वापर करण्यासाठी स्मार्ट फोन बाळगण्याची गरज नसते.