मुंबई : रिझव्र्ह बँकेने व्याजदरासंबंधी तिच्या भूमिकेत संभाव्य बदलाचे संकेत प्रथमच एका अहवालाद्वारे दिले आहेत. अर्थव्यवस्थेतील मागणीच्या परिस्थितीत होणाऱ्या सुधारणेसह ग्राहक आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढत आहे. याचबरोबर जागतिक पातळीवरील प्रतिकूल घटनांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता रिझव्र्ह बँकेने वर्तविली आहे. आता रिझव्र्ह बँकेच्या आगामी द्विमाही पतधोरण निश्चिती बैठक पुढील महिन्यात ६ ते ८ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. चालू वर्षांत करोनाची तिसरी लाट आल्यानंतर फेब्रुवारी २०२२ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग काहीसा मंदावला होता. आता मात्र अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने ग्राहकांचा आत्मविश्वास पुन्हा निर्माण होण्यास मदत झाली आहे, असे रिझव्र्ह बँकेने वित्तीय व्यवस्थेच्या स्थितीवर आधारित अहवालात नमूद केले आहे. सर्व दुकानदारांचा आणि व्यावसायिकांचा आत्मविश्वास दर्शविणारा ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियनइकॉनॉमी (सीएमआयई)’च्या निर्देशांक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमुळे शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. मात्र आता शेती क्षेत्रासह निर्मिती क्षेत्र आणि सेवा क्षेत्रांमध्ये शाश्वत पुनप्र्राप्ती होऊन विस्तार होण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण निदर्शनास येत आहेत. एकीकडे देशाच्या कर संकलनात वाढ होत आहे. सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन (जीएसटी) १.३३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या द्विमाही पतधोरणाच्या वेळी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर यांनी व्याज दर ‘जैसे थे’ राखत अर्थव्यवस्थेला विकासासाठी अनुकूल धोरणाचे समर्थन केले होते. यामुळे देशांतर्गत विकास व महागाईच्या गतिशीलतेवर आधारित सर्वसमावेशी लवचीक भूमिका तिने कायम ठेवली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक विकासाला खीळ बसली आहे. युद्धामुळे तेल आणि वायूचा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने खनिज तेलाच्या किमतीने उच्चांकी पातळी गाठली आहे. परिणामी वाढत्या किमती आणि अस्थिर आर्थिक बाजारपेठेतील परिस्थितींमुळे अर्थव्यस्थेसाठी नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत, अहवालात नमूद केले आहे. महागाई वाढल्याने कंपन्यांच्या उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी एकूणच महागाईचा पारा वाढता राहिला आहे. देशात निवडणुकांमुळे गेल्या काही चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असताना किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराने चढता क्रम कायम राखला असून रिझव्र्ह बँकेसाठी सहनशील पातळीच्या कमाल स्तराचाही भंग त्याने जानेवारी आणि फेब्रवारीत करीत ६.०७ टक्क्यांच्या पातळी गाठली आहे. त्यामुळे स्वाभाविकच विकास पूरकतेकडून महागाई नियंत्रण असा मध्यवर्ती बँकेच्या प्राधान्यक्रमात बदल होऊ घातला आहे.