अत्युच्च टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजाराच्या मुख्य निर्देशांकांनी मंगळवारी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला मात्र नांगी टाकली. वरच्या टप्प्यावर गुंतवणूकदारांची नफेखोरी आणि सौदी अरेबियातील घडामोडींमुळे भडकते तेल दर यामुळे सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकांना त्यांचे विक्रमी टप्पे सोडणे भाग ठरले. एकाच व्यवहारात ३६०.४३ अंश घसरणीमुळे मुंबई निर्देशांक ३३,३७०.७६ वर स्थिरावला. तर १०१.६५ अंश घसरणीसह निफ्टी १०,३५०.१५ पर्यंत आला. दोन्ही निर्देशांकांनी २७ सप्टेंबरनंतरची सर्वात मोठी आपटी मंगळवारी नोंदविली.

नोटाबंदीची वर्षपूर्ती होत असताना प्रमुख भांडवली बाजाराने नोटाबंदीनंतरचा ताबडतोब परिणाम पुन्हा एकदा अनुभवला, हे मंगळवारच्या बाजाराचे वैशिष्टय़ ठरले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रात्री ८ वाजता नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर त्याचे अपेक्षित पडसाद भांडवली बाजाराच्या दुसऱ्या दिवशीच्या व्यवहारात उमटले. गुरुवार, ९ नोव्हेंबर २०१७ रोजी सेन्सेक्स एकाच व्यवहारात ३३८.६१ अंशांनी आपटत २७,२५२.५३ वर येऊन ठेपला होता, तर निफ्टीतील १११.५५ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,४३२.०० वर स्थिरावला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांनी प्रति पिंप ६४ डॉलपर्यंत उसळीने बाजारातही अस्वस्थता पसरली. इंधनाचे दर हे आता गेल्या दोन वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. परिणामी येथील भांडवली बाजारात तेल व वायू क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या समभागांचे घसरले. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा एकदा ६५ पर्यंतची घसरण नोंदविल्याचे विपरित सावट बाजारात उमटले.

निश्चलनीकरण हे योग्य वेळी पडलेले धाडसी पाऊल निश्चितच. वर्षभरापूर्वी पंतप्रधानांच्या या निर्णयाचा वर्षभरात योग्य तो परिणाम दिसून आला आहे. अर्थव्यवस्थेबाहेरील पैसा मुख्य परिघात येण्याबरोबरच कराचे जाळे विस्तारले गेले आहे. हा देश कोणताही बदल स्वीकारण्यास तयार आहे हे नोटाबंदी तसेच वस्तू व सेवा करप्रणालीने दाखवून दिले आहे.

-आशीषकुमार चौहान,
व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई शेअर    बाजार.

प्रत्यक्ष कर  संकलनात १५% वाढ
एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान ४.३९ लाख कोटींचा महसूल

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन १५.२ टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान प्रत्यक्ष कराच्या रूपात ४.३९ लाख कोटी रुपये  सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. एकूण चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने अंदाजित केलेल्या एकूण ९.८० लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष करामध्ये व्यक्तिगत प्राप्तिकर व कंपनी कराचे ४४.८० टक्के प्रमाण आहे. गेल्या सात महिन्यातील ढोबळ कर संकलन (परताव्यापूर्वीचे) १०.७ टक्क्यांनी वाढून ५.२८ लाख कोटी रुपये झाले आहे, तर परताव्याची रक्कम ८९,५०७ कोटी रुपये आहे.