मुंबई : जागतिक बाजारातील चौफेर विक्रीचा मारा आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसव्र्ह आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने सेन्सेक्समध्ये ४०० अंशांची घसरण होत तो गुरुवारच्या सत्रात पुन्हा ६१ हजार पातळीखाली आला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ४१९.८५ अंशांची घसरण होऊन तो ६०,६१३.७० पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ६०,८४८.७३ अंशांची उच्चांकी तर ६०,४२५.४७ अंशांच्या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १२८.८० अंशांची घसरण झाली आणि तो १८,०२८.२० पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवरील निराशाजनक संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी देशांतर्गत बाजारात सावध पवित्रा घेतला. मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी वाहन निर्माता कंपन्या आणि सरकारी बँकांच्या समभागात विक्री करून नफावसुली केली. तसेच व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये विक्रीचा कल निदर्शनास आला. जगभरातील गुंतवणूकदार अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत आहेत. महागाई दर चार महिन्यांच्या नीचांकाला उतरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी गुंतवणूदार त्याकडे बाजारातील आशेचा किरण म्हणून बघत आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँकेच्या समभागात ३.५४ टक्क्यांची घसरण झाली. बजाज फिनसव्र्ह, टायटन, महिंद्रा, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँकेचे समभाग नकारात्मक पातळीवर व्यवहार करत स्थिरावले.