नवी दिल्ली : भारत-ब्रिटन यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करार अर्थात ‘एफटीए’संबंधी वाटाघाटी अपेक्षित वेगाने सुरू आहेत, असा निर्वाळा वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी दिला. द्विपक्षीय व्यापार व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जानेवारीमध्ये औपचारिकपणे सुरू झालेल्या या वाटाघाटीची प्रक्रिया ब्रिटनमधील ताज्या राजकीय घडामोडींमुळे मागे पडेल, अशी विश्लेषकांनी व्यक्त केलेली भीती पाहता हा खुलासा महत्त्वपूर्ण ठरतो.

गोयल यांनी स्पष्ट केले की, भारताने संयुक्त अरब अमिरातींबरोबर विक्रमी वेळेत करारासंबंधी औपचारिकता पूर्ण केली आणि ब्रिटनबरोबरच्या वाटाघाटीही वेगाने पुढे सरकत प्रगत टप्प्यावर पोहचल्या आहेत. अशा करारामधून दोन वा अधिक देश  आपापसात व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी करतात किंवा काढून टाकतात. व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांकडून नियम सुलभ केले जातात.

येथे आयोजित ‘व्यापारी उद्यमी संमेलना’त बोलताना गोयल यांनी येत्या काळात, कॅनडा, युरोपीय महासंघ आणि इस्रायलशी व्यापार करारांवर वाटाघाटी सुरू आहेत. इतर अनेक राष्ट्रांनीही भारतासोबत व्यापार करारासाठी उत्सुकता दर्शविली आहे. मात्र वाणिज्य मंत्रालयाकडे एकाच वेळी अधिक राष्ट्रांशी मुक्त व्यापार करारासंबंधाने वाटाघाटी करण्यासाठी पुरेशी संसाधने नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.