पीटीआय, नवी दिल्ली देशातील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्सने बुधवार, १९ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी ०.९ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून मंगळवारी सांगण्यात आले. तर ठरावीक वाहनांवर १० हजार रुपयांपर्यंत कपातदेखील कंपनी करणार आहे. वाहननिर्मितीसाठी आवश्यक सुटय़ा घटकांच्या किमतीत वाढ झाली आहे. शिवाय निर्मितीच्या विविध टप्प्यांवर वाढलेला सामग्री खर्च पाहता किमती वाढविणे भाग ठरले. मात्र ग्राहकांवर कमीत कमी भार पडावा असे प्रयत्न केले गेले आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले. याच वेळी ग्राहकांकडून आलेल्या अभिप्रायाला ध्यानात घेत कंपनीने ठरावीक वाहनांतील काही अनावश्यक वैशिष्टय़े कमी करून, १०,००० रुपयांपर्यंतची कपातदेखील केली आहे. टाटा मोटर्स देशांतर्गत बाजारपेठेत टियागो, पंच आणि हॅरियरसह अशा प्रवासी वाहनांची विक्री करते. कंपनीने ‘ग्राहक-प्रथम’ धोरणांचा अवलंब करत टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या श्रेणीवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व ग्राहकांना किमतीचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांनी १८ जानेवारी २०२२ किंवा त्याआधी नवीन वाहन खरेदीसाठी नोंदणी केली असेल अशा ग्राहकांना नवीन किंमत वाढ लागू होणार नसल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. गेल्या आठवडय़ात मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या विविध श्रेणीतील वाहनांच्या किमती ४.३ टक्क्यांपर्यंत वाढवल्या. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि होंडा यांच्यासह इतर कंपन्यांनीदेखील नवीन वर्षांपासून किमती वाढवण्याचे संकेत गेल्या वर्षीच दिले होते. वाहननिर्मितीस आवश्यक असलेल्या पोलाद, तांबे, अॅल्युमिनियम आणि इतर धातूंच्या किमती गेल्या एका वर्षांत वाढल्या असल्याचे कारण त्यांनी दिले आहे.