पंजाब अँड महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्यांनी ठेवीदार, खातेदार धास्तावलेले असताना देशातील नागरी सहकारी बँकांची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील नागरी सहकारी बँकांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये २२० कोटी रूपयांचे घोटाळे झाले आहेत.

आणखी धक्का देणारी माहिती अशी की २०१८ -२०१९ या एका वर्षात १८१ घोटाळे झाले आणि ते होते तब्बल १२७.७ कोटी रुपयांचे.
माहिती अधिकाराखाली पीटीआय या वृत्तसंस्थेने विचारलेल्या माहितीमध्ये रिझर्व्ह बँकेनेच हा खुलासा केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, देशभरात तब्बल एक हजारांवर घोटाळे झाले आहेत. २०१७-१८ या वर्षात ९९ प्रकरणांमध्ये ४६.९ कोटींचे घोटाळे झाले आहेत तर २०१६-१७ साली २७ प्रकरणांमध्ये ९.३ कोटी रूपयांचे घोटाळे झाले आहेत.

कोणत्या वर्षी किती झाले घोटाळे आणि त्या घोटाळ्यातील एकूण रक्कम किती होती?

वर्षघोटाळेरक्कम
२०१८-१९१८११२७.७ कोटी रुपये
२०१७-१८९९४६.९ कोटी रुपये
२०१६-१७२७९.३ कोटी रुपये
२०१५-१६१८७१७.३ कोटी रुपये
२०१४-१५४७८१९.८ कोटी रुपये

२०१५-१६ या वर्षात १८७ प्रकरणांमध्ये १७.३ कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तर २०१४-१५ या साली तब्बल ४७८ घोटाळे झाले आहेत. त्यात १९.८ कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे.

२०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षांच्या काळात तब्बल ९७२ घोटाळे झाल्याचा धक्कादायक खुलासा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. या घोटाळ्यांमध्ये २२१ कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे.

या घोटाळ्यांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते की, ”ज्या बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत त्यांनी तपास संस्थांकडे फौजदारी गुन्हे दाखल करायला हवे. तसेच घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंतर्गत प्रक्रियद्वारे कारवाई करावी. शिवाय कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीबद्दल लक्ष घालायला हवे.”

किती जणांवर झाली कारवाई?
घोटाळे करणाऱ्या किती जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली, असं विचारलं असता रिझर्व्ह बँकेने ”माहिती उपलब्ध नाही” असं उत्तर दिलं आहे.