गुंतवणुकाही आळशी आणि कामचुकार असतात. अपेक्षित परताव्यासाठी ज्या अधिक वेळ घेतात, अशा अकार्यक्षम गुंतवणूका परवडणाऱ्या नसतानाही अनेकांकडून केल्या जात असतात. परिणामी आपली वित्तीय उद्दिष्टेही अपेक्षित लक्ष्यापासून कोसो दूर राहतात.
आज ज्यांचे अर्थ नियोजन जाणून घेणार आहोत त्यांचे उत्पन्न उत्तम असूनही बचत मात्र अत्यल्प आहे. हे संदेश जोशी यांच्या बाबतीतच घडते असे नाही. चुकीच्या गुंतवणुका केल्याने परताव्याचा दर तर घटतोच, पण वाढत्या महागाईचा दर, तर दुसऱ्या बाजूला गुंतवणूकयोग्य रक्कमही दरमहा कमी होत जाते. परिणामी गुंतवणूक चुकीच्या ठिकाणी आणि दीर्घावधीसाठी झालेली असल्यामुळे आपली अनेक वित्तीय उद्दिष्टे ही अपेक्षित लक्ष्यापासून कोसो दूर राहतात. म्हणून अशा अकार्यक्षम गुंतवणुका आपल्याला परवडतील का याचा वाचकांनी आपल्या मनाशी हिशोब मांडायला हवा. तरच आर्थिक विवंचनेचे उत्तर ज्याचे त्याला मिळू शकेल.
संदेश जोशी (३८) हे संगणक अभियंता असून एका बहुउत्पादन कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी स्मिता (३५) या गृहिणी आहेत. त्या एमबीए असून पहिले अपत्य होण्याआधी गोदरेज प्रोपर्टीज या कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर नोकरी करीत होत्या. संदेश व स्मिता या दाम्पत्यास गार्गी (६) व ध्रुव (४) ही दोन अपत्ये आहेत. संदेश यांच्या गुंतवणुकीकडे नजर टाकली तर निम्न उत्पन्न गटातील वाचकांच्या इतकीच उच्च उत्पन्न गटातील वाचकांचेही अर्थप्रबोधन होणे ही काळाची गरज असल्याचे जाणवते.

संदेश यांनी एकूण एलआयसीच्या १२ पॉलिसीज् घेतल्या आहेत. याचा  अर्थ कमावते झाल्यापासून सरासरी दर तेरा महिन्याला एक नवीन पॉलिसी त्यांनी विकत घेतली आहे. जीवन सरल, जीवन अंकुर, जीवन आनंद, बीमा किरण, बीमा किरण गोल्ड हे त्यांच्याकडे असलेले काही एलआयसीचे प्लान आहेत. पुढील महिन्यात अनमोल जीवन ही आणखी एक पॉलिसी घेण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे त्यांनी ‘जीवना’च्या सर्व अंगांना आपल्या ‘गुंतवणुकी(?)’त स्थान दिले आहे.  
संदेश यांनी २०१० मध्ये म्युच्युअल फंडाच्या चार एसआयपी सुरू केल्या होत्या आणि ऑक्टोबर २०१३ पासून त्या बंद केल्या. या कारणामुळे एकूण गुंतवणुकीच्या केवळ सहा टक्के गुंतवणूक ‘इक्विटी’ म्हणजेच समभागसदृश प्रकारात आहे. भारतीयांचे आवडते गुंतवणूक प्रकार म्हणजे स्थिर उत्पन्न देणाऱ्या- बँक ठेवीत २५ टक्के आणि ७० टक्के गुंतवणूक स्थावर मालमत्तेत केली आहे. राहत्या घराला मालमत्ता म्हणायचे की गुंतवणूक म्हणायचे याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा.
त्यांच्याशी झालेल्या भेटीत संदेश यांनी त्यांची वित्तीय ध्येये लिहून आणली होती. पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी व त्यांच्या विवाहासाठी तरतूद करणे तसेच संदेश यांच्या निवृत्तीपश्चात खर्चाची तरतूद यांचा प्रामुख्याने समावेश होता.

संदेश जोशी यांना सल्ला
प्रत्येक पॉलिसीचे वस्तुनिष्ट विश्लेषण करता येणे हे प्रत्येकाला जमते असे नाही. परंतु एखादी विमा योजना कशी विकली जाते हे पाहिले तरी योजनेच्या त्रुटी लक्षात येतील. कुठल्याही योजनेची दोन दोन भागात विभागणी असते पहिली विम्याचा हप्ता व वेगवेगळी शुल्क आकारणी. विम्याचा हप्ता हा मृत्यूदराच्या प्रमाणावर ठरतो. आज आयुर्मान वाढल्यामुळे मृत्यूदराचे प्रमाण घटले आहे. मृत्यूदर जास्त धरला तर हप्ता वाढू शकतो. विमा कंपनीची मृत्युदर ठरविण्याची स्वत:ची पद्धत असते. या मृत्यूदरावर विमाधारकाचा विम्याच्या विहित कालावधीत मृत्यू येण्याची शक्यता त्या पॉलीसीचा हप्ता ठरवत असते. एलआयसीची मृत्यूदर /सरासरी आयुर्मान काढण्याची पद्धत हप्ते हे इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत वेगळी, त्यामुळे हप्त्याचे प्रमाण २० ते ५० टक्के अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण एलआयसीच देऊ शकेल. ठरविलेल्या आर्थिक उद्दिष्टांना साधण्यासाठी आवश्यक गुंतवणूक म्हणून जीवन विम्याच्या योजनांच्या खरेदी हा आजवर त्यांनी अनुसरलेला पर्याय मूळातच चुकीचा. या पॉलिसी तुमच्यासाठी संपत्तीची निर्मिती करू शकणार नाहीत. म्हणून सर्वप्रथम सर्व पॉलिसींचा हप्ता भरणे बंद करा, हाच त्यांना सल्ला.