जर उद्गम कर (टीडीएस), अग्रिम कर किंवा स्व-निर्धारण कर हा देय करापेक्षा जास्त असेल तर करदात्याला हा जास्त भरलेल्या कराच्या परताव्याचा (रिफंड) दावा प्राप्तिकर खात्याकडे करता येतो. बहुतेक करपरताव्याचे दावे हे उद्गम करामुळे करावे लागतात. बऱ्याच वेळेला बँकेला १५ जी किंवा १५ एच फॉर्म हा वेळेवर दिला गेला नसला तर बँक व्याजावर उद्गम कर कापून घेते. हा उद्गम कर बँकेने प्राप्तिकर खात्याकडे जमा केला तर त्यांना तो खातेदाराला परत करता येत नाही. हा कर खातेदाराकडून वसुल करून त्यांना १६ ए प्रमाणपत्र दिले जाते. पगारदारांच्या बाबतीत कर सवलतीच्या गुंतवणुकीची माहिती किंवा घोषणापत्र वेळेवर दिले नाही तर मालकाला पगारावर त्यानुसार उद्गम कर कापावा लागतो. पगारदार व्यक्ती एका वर्षांत एक नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारतात तेव्हा त्या वर्षांत दोन्ही मालकांनी केलेला उद्गम कर हा देय करापेक्षा जास्त असू शकतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पगारदारांनी नवीन मालकाला फॉर्म १२ बीए हा द्यावा म्हणजे नवीन मालक दोन्ही नोकरीतून मिळणाऱ्या पगाराप्रमाणे उद्गम कर कापेल आणि रिफंडचा दावा करावा लागणार नाही. आता ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरविक्रीवर १% उद्गम कराची तरतूद आहे. बहुतेक घर विक्री करणारे दुसऱ्या घरात किंवा बॉंडमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना या व्यवहारावर कर भरावा लागत नाही आणि या उद्गम करामुळे करपरताव्याचा दावा करावा लागतो.

दावा कसा करता येतो?
जास्त भरलेला कर हा प्राप्तिकर खात्याकडून विवरण पत्र भरून परत मागता येतो. जर करदात्याचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरण पत्र भरणे बंधनकारक आहे. अशांना जर करपरताव्याचा दावा करावयाचा असेल तर विवरण पत्र भरावेच लागते. परंतु जर करदात्याचे उत्पन्न करपात्र नसेल आणि कर देय नसेल अशांचा उद्गम कर कापला गेला असेल तर या कराचा परतावा त्यांना विवरण पत्र भरूनच मिळविता येते. या विवरण पत्रात करपात्र आणि करमुक्त उत्पन्न, देय कर, अग्रिम कर, उद्गम कर या विषयीची माहिती भरावी लागते. जर कर देय असेल तर स्व-निर्धारण कर भरावा लागतो आणि जर भरलेला कर देय करापेक्षा जास्त असेल तर ती रक्कम ‘रिफंड’ म्हणून दाखवावी लागते. यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नसते. या विवरण पत्रात आपल्या बँक खात्याविषयी माहिती देणे बंधनकारक आहे. रिफंडची रक्कम थेट आपल्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे किंवा ही रक्कम धनादेशाद्वारे आपल्या पत्त्यावर मागवू शकता. यापैकी एक पर्याय आपल्याला निवडता येतो. धनादेशाचा गरवापर टाळण्यासाठी या धनादेशावर आपला बँक खाते क्रमांक असतो.

दावा कधी करता येतो?
करपरताव्याचा दावा हा करनिर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत करता येतो. उदा. आíथक वर्ष २०१३-१४ चा करपरताव्याचा दावा त्या वर्षांचे विवरण पत्र हे ३१ मार्च २०१६ पर्यंत भरून करता येतो. आíथक वर्ष २०१४-१५ चा दावा ३१ मार्च २०१७ पर्यंत करता येतो. जर करदाता काही कारणास्तव या वेळेमध्ये विवरण पत्र दाखल करू शकला नाही आणि त्याला करपरताव्याचा दावा करावयाचा असेल तर नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात (परिपत्रक क्र. ९ दि. ९ जून २०१५) या संबंधीची कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे. या नुसार करदाता सहा वर्षांपर्यंत म्हणजेच आíथक वर्ष २००८-०९ आणि त्यानंतरचा करपरताव्याचा दावा आता करू शकतो. याकरिता काही अटींची पूर्तता करावी लागते. अट एक, ज्या उत्पन्नावरच्या कराचा परतावा तुम्ही घेत आहात ते उत्पन्न दुसऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नात गणले गेले नसले पाहिजे. अट दोन, कर परताव्याचा दावा हा उद्गम कर, अग्रिम कर आणि स्व-निर्धारण यातूनच आला असला पाहिजे. अट तीन हा कर परतावा बिनव्याजी असेल. या साठी विवरण पत्र दाखल न करू शकल्याचा विलंब माफी विनंती अर्ज करावा लागतो. या परिपत्रकात ही विलंब माफी कोण देऊ शकतो याची माहिती आहे. जर करपरताव्याचा दावा पूर्वी केला आहे आणि नंतर त्या वर्षांसाठी अतिरिक्त किंवा अधिक रकमेचा दावा (जो पूर्वी केला नसेल) करावयाचा असेल तर तो सुद्धा वरील परिपत्रकानुसार आपण करू शकतो.

दावा कोण करू शकतो?
करपरताव्याचा दावा हा करदात्याला स्वतला करावा लागतो. जर करदात्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या करपरताव्याचा दावा हा त्याच्या वारसदाराला करावा लागतो. आणि हा करपरतावा वारसदाराला मिळतो.

‘रिफंड’वर मिळणारे व्याज?
कलम २४४ अ प्रमाणे जास्तीच्या अग्रिम कर आणि उद्गम करामुळे उद्भवणाऱ्या करपरताव्यावर दरमहा ०.५% (वार्षकि ६%) प्रमाणे सरळ व्याज करदात्याला देण्याची तरतूद आहे. हे व्याज त्या करनिर्धारण वर्षांच्या १ एप्रिल पासून सुरु होते. उदा. आíथक वर्ष २०१४-१५ (कर निर्धारण वर्ष २०१५-१६) साठी अग्रिम आणि उद्गम कराच्या करपरताव्यावरील व्याज हे १ एप्रिल २०१५ पासून मिळते. स्व-निर्धारण करामुळे उद्भवलेल्या करपरताव्यावरील व्याज हा विवादित मुद्दा आहे. करपरताव्याची रक्कम ही एकूण निर्धारण केलेल्या कराच्या १०% पेक्षा कमी असल्यास त्यावर व्याज मिळत नाही. जर करदात्यामुळे परताव्यास विलंब झाल्यास त्यावर व्याज मिळत नाही. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे परतावा विलंब माफी विनंती अर्ज करून (९ जूनच्या परिपत्रकाप्रमाणे) मिळणार असेल तर त्यावर व्याज मिळत नाही.

लागणारा कालावधी?
सामान्यत: विवरण पत्र भरल्यानंतर एका वर्षांच्या आत कर परतावा मिळतो. विवरण पत्र संगणकाद्वारे ऑनलाइन दाखल केल्यास करपरतावा लवकर मिळतो. परंतु करपरतावा वेळेवर न मिळण्याची किंवा कमी मिळण्याची अनेक कारणे असू शकतात. एक उद्गम कर आपल्या पॅन खात्यात जमा झाला नसेल तर याला कारण आपण उद्गम कर कापणाऱ्याला आपला पॅन चुकीचा दिला किंवा उद्गम कर कापणाऱ्याने तो चुकीचा टाकला असेल किंवा त्याने कापलेला उद्गम कर भरला नसेल तर. म्हणून आपल्या पॅनवर उद्गम कर जमा झाला आहे किंवा नाही हे वेळोवेळी फॉर्म २६ एएस मध्ये तपासून बघावे. दुसरे आपण विवरण पत्रात बँक खाते किंवा पत्ता चुकीचा टाकला असेल किंवा बदलला असेल तर. तिसरे आयटीआर-५ हा फॉर्म विवरण पत्र दाखल केल्यापासून १२० दिवसांच्या आत बंगळूरू येथे पाठवावा लागतो तो न पाठविल्यास.
करपरताव्याची स्थिती प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जाणून घेता येते. परताव्याची प्रक्रिया झाली आहे, परतावा दिला आहे किंवा नाही, करपरताव्याचा धनादेश परत मिळाला आहे वगरे माहिती या संकेतस्थळावर समजू शकते. ही माहिती वेळोवेळी तपासून बघावी.

रिफंड न मिळाल्यास?
विवरण पत्रात भरलेली बँकेच्या खात्यासंबंधी किंवा पत्त्यासंबंधी माहिती चुकीची असल्यास किंवा बदलली असल्यास ही माहिती सुधारण्यासाठी ऑनलाईन विनंती करता येते. उद्गम कर किंवा भरलेला अग्रिम किंवा स्व-निर्धारण कर आपल्या पॅन खात्यात जमा झाला नसेल तर ऑनलाईन सुधारणा (रेक्टीफिकेशन) केल्यास त्या आधारे करपरताव्याची प्रक्रिया प्राप्तिकर खाते करते.
परतावा न मिळण्याचे असेही कारण असू शकते की प्राप्तिकर खात्याकडील माहितीनुसार मागील वर्षांमध्ये असणारी कर मागणी (टॅक्स डिमांड) बाकी असेल आणि ही मागणी खात्याने परताव्याच्या समोर जुळवून परतावा कमी किंवा मुळीच दिला नसेल. कलम २४५ प्रमाणे हा परतावा मागणीसमोर जुळवून घेण्याचा अधिकार प्राप्तिकर खात्याला आहे. तथापि ही माहिती करदात्याला कळविण्याची जबाबदारी प्राप्तिकर खात्यावर आहे. जर आपल्या माहितीनुसार अशी मागणी बाकी नसेल तर ज्या वर्षांची मागणी प्राप्तिकर खात्यानुसार बाकी आहे त्या वर्षी सुधारणा (ऑनलाईन) अर्ज करावा किंवा आपल्या अखत्यारीतील प्राप्तिकर अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
जास्त काळापासून करपरतावा बाकी असेल तर प्राप्तिकर अधिकाऱ्याला पत्र लिहून परतावा देण्याविषयी विनंती करता येते. आणि तरीही तो मिळत नसेल तर सरकारने नेमलेल्या स्वतंत्र अधिकाऱ्याकडे (ओम्बुड्समन) आपण योग्य कागदपत्र जोडून तक्रार करू शकता. हा अधिकारी काही शहरांमध्ये नेमण्यात आला आहे.

माहिती कशी मिळवाल?
आपले कोणत्या वर्षीचे किती कर परतावे मिळण्याचे बाकी आहेत याची माहिती ठेवणे गरजेचे आहे. ही माहिती प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावरील माहितीशी वेळोवेळी जुळवून बघावी. या माहितीच्या आधारे तुम्हाला या संबंधात प्राप्तिकर खात्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात मदत होईल.

नियोजनाची गरज
आपले उत्पन्न, अग्रिम कर आणि उद्गम कराकडे बारकाईने लक्ष दिल्यास आणि त्याचे नियोजन केल्यास परताव्याचा दावा करण्याची वेळच येणार नाही, असे पाहिले पाहिजे. या साठी आपले फॉर्म १५ जी, १५ एच, तर पगारदारांनी कर सवलतीच्या गुंतवणुकांचे कागदपत्र वेळेवर सदर करावे. घर विक्री करावयाची असल्यास त्यावर गुंतवणुकीद्वारे कर भरावा लागणार नसेल तर त्यावर केला जाणारा उद्गम कर कापला न जावा यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे अर्ज करून कलम १९७ नुसार असे प्रमाणपत्र मिळविता येते त्याद्वारे घर खरीददार उद्गम कर कापणार नाही.
लेखक सनदी लेखाकार
pravin@rediffmail.com