केएनआर कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी १९९५ मध्ये स्थापन झालेली असली तरीही तिच्या कार्यान्वयनास खरी सुरुवात कंपनीचे प्रवर्तक के नरसिंह रेड्डी यांच्या भागीदारी व्यवसायातून १९७९ पासूनच झाली आहे. म्हणजे जवळपास ३६ वर्षांचा अनुभव या कंपनीच्या पाठीशी आहे. सुरुवातीला केवळ बांधकामाचे कंत्राट घेणारी ही कंपनी १९९७ सालच्या ‘आयपीओ’नंतर मोठी कंत्राटे घेऊ लागली. गेल्या २० वर्षांत भारतातील १२ राज्यांत तिने कामे केली असून सुमारे ५,८८८ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले आहेत. सध्या कंपनी रस्ते बांधणी, महामार्ग टोल प्रोजेक्ट्स तसेच धरणे, पाटबंधारे आणि पाण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या प्रकल्पांत अग्रेसर आहे. याखेरीज कंपनी ईपीसी प्रकल्पदेखील हाती घेते. आजच्याघडीला कंपनीकडे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर चार प्रकल्प असून ३,४७० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. डिसेंबर २०१६ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २०३.५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३२.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १२०% ने अधिक आहे. मार्च २०१६ तसेच मार्च २०१७ चे आर्थिक वर्ष ‘केएनआरसी’साठी आशादायी, प्रगतीकारक आणि महत्त्वाचे ठरेल. २०१६-१७ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून पायाभूत सोयीसुविधा तसेच रस्ते बांधणीसाठी मोठी तरतूद केली गेली असून पायाभूत सुविधांच्या नियोजनांनुसार राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण अजून तीन वर्षे तरी चालू राहील अशी आशा आहे. गेल्याच वर्षी कंपनीला वलायर - वडकांचेरी या बीओटी तत्त्वावर बांधलेल्या हमरस्त्यासाठी, प्रकल्प नियोजित कालावधीच्या आत पूर्ण केल्यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडून परितोषिक मिळाले होते. कंपनीच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आलेख, अनुभव आणि क्षमता पाहता आगामी काळात कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल यांत शंकाच नाही. अत्यल्प कर्ज असलेल्या या कंपनीतील मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com