|| वसंत कुलकर्णी

पुलंनी ‘गणगोत’मध्ये फणसाळकर मास्तरांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. पुलंचे आजोबा ‘ऋग्वेदी’, सूर्यनमस्काराचार्य सोमण मास्तर, लष्करी खाक्याचे दादा पारधी, श्रीमंत चांदीवाले परांजपे आणि लौकिक अर्थाने मास्तरकी न केलेल्या परंतु मूळच्या शिक्षकी वृत्तीमुळे पाल्र्यात ‘फणसाळकर मास्तर’ अशी ओळख असलेल्यांचा आदराने उल्लेख त्यांनी केला आहे. शताब्दीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाल्र्याचे टिळक मंदिर स्थापन करण्यापासून कार्यक्रमाची सूचना देणारी मंदिराची घंटा वाजविण्याचे काम फणसाळकर मास्तरांनी मोठय़ा निष्ठेने केले. कालानुरूप बदल हे होतच गेले. गीता वर्गाच्या ठिकाणी स्वस्त धान्याचे दुकान आल्याची खंत पुलंनी व्यक्त केली आहे.

आता मंदिरात गीता वर्गाच्या ठिकाणी आता गुंतवणूक मार्गदर्शन केंद्र सुरू झाले आहे. हे केंद्र सुरू झाल्यालासुद्धा ३५ हून अधिक वर्षे होऊन गेली. केंद्राच्या स्थापनेपासून आजतागायत या केंद्राची धुरा वाहणारे प्राध्यापक सीए अशोक ढेरे येत्या शुक्रवारी अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करत आहेत. अर्थसाक्षरता आणि गुंतवणूक मार्गदर्शन या क्षेत्रातील त्यांचा उत्साह त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी लहान असलेल्या माझ्यासारख्यांना कायमच प्रेरित करणारा आहे. गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे कार्यक्रम ठरविणे, ठरल्याचे लोकांपर्यंत पोहोचविणे, ‘आम्ही पाल्रेकर’सारख्या स्थानिक नियतकालिकात प्रसिद्धीसाठी पोहोचविणे आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम तडीस नेणे, या सर्व गोष्टीत सर आवर्जून सहभागी होत असतात. या मार्गदर्शन केंद्रात महिन्यातील एक रविवार सर प्राप्तिकरावर वैयक्तिक समुपदेशन करतात. हे वैयक्तिक समुपदेशन नि:शुल्क असते.

मुंबई विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू एमडी लिमये, ढेरेसरांना पहिल्यांदा शिक्षक, मार्गदर्शक आणि नंतर महाविद्यालयात वरिष्ठ सहकारी म्हणून लाभले. शालान्त परीक्षा ते पदवी दरम्यान सरांनी उदरनिर्वाहासाठी सात-आठ नोकऱ्या केल्या. बायर इंडिया या बहुराष्ट्रीय कंपनीत लेखापाल म्हणून सर नोकरी करीत होते. एके दिवशी त्यांची बदली बायरमध्ये दिल्लीला ब्रांच अकाऊंटंट म्हणून झाली. ढेरे सर के. आर. शहा सरांचा निरोप घ्यायला गेले असताना, कशाला मुंबई सोडतोस सीए कर असा सल्ला शहा सरांनी दिला आणि आपल्याकडे आर्टकिलशिपसाठी दाखल करून घेतले. सीए करताना मासिक केवळ ५० रुपये विद्यावेतनात मुंबईत कसे भागेल हा प्रश्न भेडसावत असताना, ‘तू पाण्यात पडून पोहायला शिक, बुडणार नाहीस याची काळजी मी घेईन,’ असे लिमये सर म्हणाले आणि लिमये सरांनी गरज होती तेव्हा मदतीचा हात दिला. अशा रीतीने दोन गुरुद्वयांच्या प्रोत्साहनामुळे ढेरे सर इंटर आणि फायनल दोन्ही परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले. ढेरे सरसुद्धा या गुरूंचे ऋण नेहमीच मान्य करतात. सहज बोलतानासुद्धा गाण्याबजावण्यातील मंडळी आपल्या गुरूच्या स्मरणाने कानाच्या पाळीला हात लावतात अगदी तीच भावना ढेरे सरांची असते. लिमये सरांच्या स्मरणार्थ दरवर्षी लिमये स्मृती व्याख्यानमालेचे लोकमान्य सेवा संघाच्या माध्यमातून आयोजन होते. गुंतवणूक अर्थशास्त्र या सारख्या विषयातील एखाद्या अधिकारी व्यक्तीस निमंत्रण देऊन त्यांचे विचार ऐकविण्याचा आणि त्या निमिताने आपल्या गुरूचे स्मरण करण्याचा हा प्रघात पाल्रेकरांच्या चांगलाच परिचयाचा आहे. हे वर्ष लिमयेसरांचे शताब्दी वर्ष असल्याने मंदिरात होणारी ‘फायनान्स फेअर’ लिमये सरांच्या स्मृतीस समíपत करण्याच्या योजकतेतून सरांनी आपल्या गुरूंप्रति आदर व्यक्त केला आहे.

विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राची संकल्पना लिमये सरांनी मांडली आणि पाल्र्याच्या टिळक मंदिर (लोकमान्य सेवा संघाच्या) माध्यमातून ती साकारली. लोकांची अर्थनिरक्षरता लिमये सरांना टोचत असे. चांगले कष्ट करून कमावलेले पसे ८-१० टक्के परतावा असलेल्या (त्या काळी पीपीएफचा व्याज दर १४ टक्के होता) वित्तीय उत्पादनांत केवळ परताव्याची खात्री आहे म्हणून का गुंतवावे असा प्रश्न लिमये सरांना पडला. पुलंनी वर उल्लेख केलेल्या या सर्व मंडळींबद्दल लिहिले आहे – ‘‘ही साधी साधी माणसे भलत्याच गोष्टी मॅन्युफॅक्चर करण्याचे वेड घेऊन बसली होती. सोमण मास्तरांना पाल्र्यातून गामा तयार करायचा होता, माझ्या आजोबांना मॅक्स मुलरच्या तोडीचा विद्वान बनवायचा होता.’’ कदाचित लिमये सरांच्या नजरेला ही अर्थनिरक्षरता दिसली असेल आणि ‘सेबी’ने अर्थसाक्षरतेचा बिगूल वाजविण्याच्या किती तरी आधी हे रणिशग फुंकले. ढेरे सर पहिल्या कार्यक्रमापासून या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. सुरुवातीच्या काळात ताळेबंद कसा वाचावा, कोणते रेशो महत्त्वाचे, कंपनीची आर्थिक स्थिती कशी तपासावी इत्यादींवर शनिवारी संध्याकाळी व्याख्याने होत असत. लोकांची आणि वक्त्याची सोय म्हणून हल्ली महिन्यांतून दोन रविवार ११ ते १२.३० दरम्यान ही व्याख्याने होतात. व्याख्यानादरम्यान श्रोते वैयक्तिक प्रश्न विचारण्यास संकोचतात म्हणून दोन रविवार वैयक्तिक समुपदेशन सुरू झाले. दुर्दैवाने येणारी मंडळी एखाद्या गुंतवणुकीच्या शिफारसीसाठी येतात, या बद्दल ते खंत व्यक्त करतात. या उपक्रमाला सुरुवात झाली तेव्हा येणारी मंडळी साठीच्या पलीकडली होती. आजही ज्येष्ठ नागरिकांचीच या उपक्रमाला अधिक हजेरी असते. ज्या वयात पसे कमवायचे आणि त्यांची योग्य गुंतवणूक करायची त्या वयाचे श्रोते अभावानेच आढळतात.

आर्थिक क्षेत्रात सरांचे खूप मोठे योगदान आहे. सनदी लेखापालांची स्थानिक संघटना असलेल्या ‘बीसीए जर्नल’चे पाच वर्षे संपादक होते. अजूनही संपादकीय मंडळावर सर सक्रिय असतात. मुंबई शेअर बाजार, मल्टिकमॉडिटी एक्स्चेंज, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या वेगवेगळ्या समित्यांवर काम केले आहे. ‘‘लवादावर काम करताना अनेकदा ब्रोकरने अशिलाला टोपी घातली आहे हे स्पष्ट दिसत असूनही सबळ कागदपत्रांच्या अभावी अशिलाच्या बाजूने निकाल देता येत नाही. गुंतवणूक व्यवहारात कागदपत्रे सांभाळणे आणि तंटाबखेडा झालाच तर ते कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते,’’ असे त्यांचे सांगणे आहे. सामान्य गुंतवणूकदाराने त्यातले कळत नसल्यास ‘डेरिव्हेटीव्हज्’पासून दूरच राहायला हवे. आपले शेअर तुमची संपत्ती आहे ती तुमच्या डीमॅट खात्यात पडून राहिली तरी चालेल पण फुटकळ पसे कमावण्याच्या मोहाने ‘डेरिव्हेटीव्हज् ट्रेिडग’पासून दूर राहा. या गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर पुढील पिढीला तयार करत आहेत. सरांचा हा अर्थसाक्षरतेचा वसा पुढे न्यायला ही सर्व मंडळी समर्थ आहेत. सागराला मिळणाऱ्या गंगेचा प्रवाह कितीही विशाल दिसला तरी गंगेचा उगम हा एका जलधारेपासून झाला आहे. आज अर्थसाक्षरतेचा बडेजाव होणारा खर्च डोळे दिपविणारा आहे. म्हणूनच ढेरे सरांच्या अर्थसाक्षरतेच्या कार्याचे महत्त्व आहे. सरांचा प्रपंच त्यांच्या पत्नी जयश्री ढेरे यांनी निगुतीने सांभाळला म्हणून त्यांना आणि सरांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

shreeyachebaba@gmail.com