* निर्देशांक रोज नवीन उच्चांक प्रस्थापित करीत असतांना बाजाराच्या भविष्यातील वाटचाली बंद्दल काय वाटते?

ललित नांबियार :    निर्देशांक तेजीची नवनवीन शिखरे जरी पादाक्रांत करीत असले, तरी दोन ते तीन वर्षांचा विचार केल्यास तेजी अशीच निरंतर चालू राहील असे वाटते. असे वाटण्याची कारणे अर्थव्यवस्थेच्या बदलामध्ये आहेत. अर्थचक्राने आपली दिशा नक्कीच बदलली आहे. बाजार हा कधीच एका दिशेने जात नसतो. बाजारात चढ-उतार होतच असतात.

* आज दोन प्रकारचे गुंतवणूकदार नजरेस पडत आहेत. ज्यांनी या आधी गुंतवणूक केली आहे असे व ज्यांना निर्देशांकाची पातळी गुंतवणूक करण्यास धोक्याची वाटली व त्यामुळे जे गुंतवणूक न करता काठावर बसून राहिले असे. या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांना तुमचा काय सल्ला आहे.

ललित नांबियार: वर उल्लेख केल्याप्रमाणे दीर्घ कालावधीसाठी बाजार चांगलाच वाटतो. जे कोणी गुंतवणुकीत शिस्तीचे पालन करणारे असतील त्यांनी आपली गुंतवणूक तशीच ठेवावी. जे कोणी विविध कारणांनी गुंतवणूक करू शकलेले नाहीत त्यांनी तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र अशा गुंतवणूकदारांनी लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करणे जरुरीचे आहे.

* तुम्ही (यूटीआय म्युच्युअल फंडाने) नुकतीच ‘यूटीआय फोकस्ड इक्विटी फंड सिरीज-१’ या मुदत बंद योजनेच्या युनिट्सची विक्री करून निधी उभारला. भारतात एकाही मुदत बंद योजनेचा परतावा लक्षात रहावा असा नाही. तरीही मागील सहा महिन्यांपासून मुदत बंद योजनांचे अमाप पीक आल्यासारखी परिस्थिती आहे. तुमच्यासारखी जुनीजाणत्या म्युच्युअल फंड घराण्यांला देखील मुदतबंद योजनांचा मोह का व्हावा?

ललित नांबियार : आमच्या या फंडात ७६,००० हून अधिक गुंतवणूकदारांनी ७७० कोटींहून अधिक रक्कम गुंतवून आमच्यावरचा विश्वास प्रगट केला आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आर्थिकआवर्तनांनी आपली दिशा बदलली आहे. या गोष्टीमुळे गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्याची संधी निर्माण झाली आहे. याच्या जोडीला बदलेल्या परीस्थितीमुळे आमच्या सुरू असलेल्या योजनांच्या परताव्याचा दरही गुंतवणूकदारांना आकृष्ट करणारा आहे. या अव्वल कामगिरीत जसा बदलेल्या परिस्थितीचा वाटा आहे तसाच आमच्या गुंतवणूक विभागातील समभाग संशोधनाचाही वाटा आहे. सर्वच गुंतवणूकदार हे काही शिस्तीचे भोक्ते असत नाहीत. अनेकदा म्युच्युअल फंड गुंतवणूकीतून झालेला नफा काढून घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो. काही मोजके गुंतवणूकदार असे आहेत की ज्यांना समभाग गुंतवणूक ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे याची जाणीव आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी आम्ही ही मुदत बंद योजना आणली आहे.