साधारण मध्यमवर्गीय कुटुंबांतलं हे ब्रीदवाक्य.. ‘खूप काम करा, भरपूर कमवा’! अशा वातावरणातच लहानाचा मोठा झालो (वयाने). स्वत:चे घर झाले, गाडी आली, मुलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. प्रामाणिक कष्ट, योग्य लोकांचा सहवास, यामुळे जगणं मजेत चाललं होतं आणि एक दिवस अचानक मनात आलं - माझं मी सध्या निवृत्तीपश्चात जीवन आनंदाने जगत आहे. अगदी सुरुवातीपासूनच नियमित बचत केल्यामुळे आज आर्थिक आघाडीवर कुठल्याही प्रकारची काळजी नाही. खरेतर आमच्या वेळी म्हणजेच साधारण ५०-५५ वर्षांपूर्वी बचतीच्या बाबतीत एवढी जागरूकता नव्हती. १९६४ साली मी रेल्वेमध्ये नोकरीस लागलो. त्या काळी पगारही काही आजच्या इतके नव्हते पण जो काही पगार मिळायचा तो मी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द करायचो. नोकरी लागल्याच्या एक वर्षांनंतर मला रेल्वेमधील माझ्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने बँकेतील बचत खात्याबद्दल माहिती दिली आणि माझे पहिले बचत खाते मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चालू केले आणि अशी माझ्या बचतीची सुरुवात झाली. त्याकाळी पगारातील १० रुपये दरमहा नियमितपणे मी या खात्यात जमा करायचो. काही काळानंतर लग्न झाले. नंतर मुलं झाली आणि मग मुलांच्या भविष्यासाठी आवर्ती ठेवी (आरडी) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) यांत नियमितपणे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मुलांचे शिक्षण, दिवाळी आणि इतर समारंभ किंवा अशा अनेक वार्षिक खर्चाची तरतूद ही आरडीमधून करायचो. जसाजसा पगार वाढायचा तसतसे ही बचत वाढवायची हे सूत्र कटाक्षाने पाळत गेलो. एका नातेवाईकाने सरकारी विमा गुंतवणूक कंपनीबद्दल माहिती दिली आणि मग त्यामध्ये काही प्रमाणात गुंतवणुकीची सुरुवात केली. मुलं जशी मोठी होत गेली तशी त्यांच्या नावावर एक विमा पॉलिसी काढून दिली, सुरुवातीला त्याचे हप्ते मीच भरायचो पण त्यांना नोकरी लागल्यानंतर त्याचे हप्ते भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली म्हणजे त्यांनाही त्या कारणाने बचतीची सवय लागली. आमच्या काळात बचतीचे पर्याय हे मर्यादित होते ते म्हणजे बँक, पोस्ट ऑफिस आणि विमा कंपनी. आपल्याकडे सोने विकण्याची पद्धत नसल्यामुळे सोन्यात कधीही गुंतवणूक केली नाही. अलीकडेच मुलांच्या सांगण्यावरून करबचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या ‘ईएलएसएस’ प्रकारात गुंतवणूक केली आहे. आमच्या वेळी अशी वर्तमानपत्रातून किंवा टीव्हीवरून गुंतवणुकीसंबंधी कुठलीही माहिती मिळायची नाही. त्यामुळे अज्ञान किंवा भीतीपोटी कंपनी समभागामध्ये कधीही गुंतवणूक केली नाही. - अरविंद देशपांडे तज्ज्ञ टिप्पणी : आपण बरेचदा गुंतवणूक कुठे आणि कशी करावी याबद्दल चर्चा करत असतो. पण गुंतवणुकीची सुरुवात कधी करावी याकडे दुर्लक्ष करतो. अरविंद देशपांडे यांनी गुंतवणुकीची सुरुवात अगदी सुरुवातीच्या काळापासून आणि नियमितपणे केली. त्यामुळे निवृत्तीपश्चात आज ते आनंदाने जीवन जगत आहेत. दुसरे म्हणजे त्यांनी दरवर्षी वाढीव पगाराप्रमाणे गुंतवणूक ही वाढवली. त्यामुळे हे गुंतवणुकीतील सातत्य आणि पद्धतशीरपणा याचे एक आदर्श उदाहरण आहे. - सुयोग काळे (गुंतवणूक सल्लागार)