भांडवली बाजारासाठी विद्यमान २०१३ पासूनचा कालावधी, विशेषत: गेल्या तिमाहीचा काळ नकारात्मक राहिला आहे. सरलेल्या जूनमध्ये तर कमालीची निराशा अनुभवली गेली आहे. चालू खात्यातील तूट-महागाई अद्यापही चढीच असणे; डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपया, परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरविणे असे नष्टचर्य बाजाराच्या मागे लागले आहे. परंतु आता बाजारात तेजीला वेग देईल, असे निर्णयही सरकार पातळीवरून घेतले जाऊ लागले आहेत. अशा स्थितीत नजीकच्या भविष्याला गुंतवणूकदारांची दिशादर्शन करणारी ही यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्ष व फंड व्यवस्थापिका स्वाती कुलकर्णी यांच्याशी झालेली बातचीत..

सेन्सेक्समध्येच वेग धरतो, असे चित्र दिसते. पण गेल्या तीन महिन्यात तो सतत १९ हजाराच्या आसपास रेंगाळत आहे. भांडवली बाजार, चलन व्यासपीठ अशा साऱ्याच आघाडय़ांवरील निराशेच्या मळभाला कारणे ती काय?
– गेले अनेक महिने आपण पाहिले, अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. त्याला बळ मिळेल असे नेमके निर्णय होत नव्हते. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील विपरीत घडामोडींचीही जोड मिळत होती. अरिष्टग्रस्त युरोझोनबरोबरीने अमेरिकेतील अर्थव्यवस्थेविषयी चिंतेची छाया जगभरच्या वित्तीय व्यवस्थेवर होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर वायदे वस्तूंच्या किमतीही उंचावल्या. याच्या परिणामी तेथील तसेच आशियाई भांडवली बाजारांमध्येही दिवसागणिक अस्थिरता दिसून आली.

ल्ल     मुंबई निर्देशांकाच्या १९,००० पुढील वाटचालीमुळे बाजार आता स्थिरावू पाहत आहे, असे म्हणता येईल काय? १९ हजारापुढील स्थिरता नजीकच्या कालावधीसाठी कायम राहील, असे वाटते काय?
– होय. भांडवली बाजार आता स्थिर होत आहे. त्याच्या तळापासून त्याने उभारी घेतली आहे. अर्थव्यवस्थेचे चित्र अधिक स्पष्ट होत असल्याचे प्रतिबिंब त्यावरही उमटत आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित काही समस्या आपण नेमकेपणाने जाणून घेतल्या होत्या. मात्र त्याबाबत उपाययोजना अमलात येत नव्हत्या. अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लागेल अशा निर्णयांची थेट प्रचीती आता येऊ लागली आहे. कोळसा, वायू क्षेत्राशी संबंधित निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत. थेट विदेशी गुंतवणूकमर्यादा वाढीच्या दृष्टीनेही पावले पडत आहेत. ‘सेबी’द्वारेही विदेशी संस्थागत गुंतवणुकीबाबत दिल्या गेलेल्या प्रोत्साहनामुळेदेखील भांडवली बाजारात विशेषत: किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होऊ लागला आहे.

ल्ल     भांडवली बाजार, विदेशी चलनातील अस्थिरता आता समाप्तीच्या दिशेने आहे, तर वाढती वित्तीय/व्यापार तूट तसेच महागाई अजूनही देशावरील एक मळभ म्हणून कायम आहे. ते बाजाराला अडथळे ठरणार नाहीत ना?
– देशात महागाईबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली गेली. रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरणही याला अनुसरूनच आखले गेले आहे. मान्सूनची जोड आणि जागतिक बाजारात प्रमुख जिनसांच्या स्थिर होत असलेल्या किमती आगामी कालावधीत महागाईदरात सुधार आणण्यास पूरक ठरतील. मध्यवर्ती बँकेचा आगामी निर्णयही आता त्यावर अवलंबून असेल. चलन अथवा भांडवली बाजारातील अस्थिरतेबाबत म्हणायचे झाले तर भारताप्रमाणेच अन्य विकसनशील देशांतही ते चित्र पाहायला मिळाले. विदेशी वित्ताचा ओघ सकारात्मक राहिला तर चलनात अधिक स्थिरता येऊ शकते. चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी निर्यात वाढविली पाहिजे. तथापि भारताची इंधनाची गरज म्हणून सर्वाधिक अवलंबित्व असलेल्या तेल आयातीबाबत काटकसरीला फार मर्यादा आहेत. तेल आयात ही आपली यापुढेही लंगडी बाजू राहीलच. सोने आयातीवरील र्निबध मात्र परिणाम साधत आहेत. दोन-एक महिन्यात याचे सुपरिणाम प्रकर्षांने जाणवतील.
शिवाय राजकीय घडामोडींनाही भांडवली बाजार प्रतिसाद देतोच. येत्या वर्षांत सर्वसाधारण निवडणुका होत आहेत. नवे सरकार कोणते येणार, याचीही उत्सुकता बाजारालादेखील आहेच. नव्या निर्णयांकडे गुंतवणूकदार कसे पाहतात, तेही दिसेल.

ल्ल      हो. पण येथील भांडवली बाजाराच्या आगामी प्रगतीच्या दृष्टीने तुमचे काय भाकीत असेल?
– भारताबाबत सांगायचे झाले तर आता देशातील अर्थव्यवस्थेच्या सुधाराच्या दृष्टीने येथील सरकारकडून आता आशादायक संकेत मिळत आहेत. भांडवली बाजाराला अधिक उभारी देण्यास हेच निर्णय कारणीभूत ठरतील. बाजारातील चढय़ा हालचालींना याच उपाययोजना उचलून धरतील. स्थानिक अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी घेतले जाणारे निर्णय मध्यम कालावधीसाठी उपयोगी ठरतील. ते अधिक जलद घेतले जावेत, अशी अपेक्षा आहे.

ल्ल बाजारातील नेमके चित्र आता कसे असेल, असे तुम्हाला वाटते?
– भांडवली बाजारातील ओघ हा स्थानिक घडामोडींवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळेच इक्विटी बाजारात अस्थिरताही नोंदवली जाऊ शकते. बाजारात तेजी आली तर ती नफेखोरी ठरेल. शिवाय निर्देशांकातील सुधार म्हणजे गुंतवणुकीची संधीच. मूल्य आकर्षक असल्याने इक्विटी फंडातील गुंतवणुकीचा सल्ला द्यायला आवडेल. इक्विटी मालमत्ताही महागाईवर मात करू शकतात. बाजारातील सुधाराचा उपयोग करून दीर्घकालासाठी गुंतवणूक करा, असेच सांगावेसे वाटते.

ल्ल     गुंतवणूकदारांसाठी अशा स्थितीत कोणत्या क्षेत्रातील समभाग फायद्याचे ठरतील?
– ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती, कंपन्या, बँक, माहिती तंत्रज्ञान सेवा कंपन्या, औषधनिर्माण कंपन्या या क्षेत्रांतील समभागांना आगामी कालावधीत चांगले भवितव्य आहे. सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या निर्णयाशी संबंधित क्षेत्रे, कंपनी समभागांवर भर द्यायला हरकत नाही. एकूणच गुंतवणूकदारांनी मागे वळून न पाहता भविष्याकडे बघून आता गुंतवणुकीचे धोरण अवलंबवावे.

भांडवली बाजारातील ओघ हा स्थानिक घडामोडींवर मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे.  बाजारात तेजी आली तर नफेखोरी अथवा निर्देशांकातील सुधार म्हणजे गुंतवणुकीची संधीच..  बाजारातील सुधाराचा उपयोग दीर्घकालासाठी गुंतवणुकीसाठी करावा, असेच सांगावेसे वाटते.

– स्वाती कुलकर्णी
कार्यकारी उपाध्यक्ष व फंड व्यवस्थापिका
यूटीआय अ‍ॅसेट मॅनेजमेंट