गौरव मुठे ‘ईएमआय’चा सापळा समजून घ्या! चालू वर्षांत रिझव्र्ह बँकेने रेपोदरात वाढ सुरू केल्यानंतर वित्तसंस्था आणि बँकांनीदेखील कर्जावरील व्याजाचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी गेल्या वर्षांपर्यंत अगदी स्वस्त दरात मिळणारे सर्व प्रकारची कर्जे महागली आहेत. तरीही बरेच लोक अजूनही कोणतेही नियोजन न करता लाख रुपयांवर अगदी किरकोळ हप्ता या बँक आणि वित्त संस्थांच्या जाहिरातींकडे आकर्षून आवाक्याबाहेरच्या वस्तू खरेदी करतात. कर्ज घेऊन उत्पादक किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे ही मुख्य समस्या नसून, ‘बजेट’पेक्षा जास्त किमतीची वस्तू खरेदी करणे ही खरी समस्या आहे. कारण सध्या अनेक कंपन्या क्रेडिट कार्डवरील खरेदीवर अमुक सवलत म्हणून मोठय़ा जाहिराती करतात आणि सामान्य ग्राहक क्रेडिट कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून वित्तीय आरोग्याला हानी पोहोचवतात. सध्याच्या वाढत्या कर्ज हप्तय़ाच्या काळात तुम्ही स्वत:ला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहेत. उत्पन्नात वाढ झाल्यानंतर बचतीत वाढ होते का? शक्यतो नाही! उत्पन्न वाढूनही पैशांची बचत करायला जमत नाही, असेच बहुतांश लोकांकडून उत्तर मिळेल. कारण उत्पन्नात वाढ झाली तरी वाढत्या कर्ज खर्चामुळे बचत होत नाही. अधिक ‘ईएमआय’ भरावा लागतो आणि हाती काहीच बचत शिल्लक राहात नाही. उत्पन्नात झालेल्या प्रत्येक वाढीसोबत खर्चात वाढ का होते? याचे सोपे उत्तर आहे, ‘स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग’ म्हणजेच राहणीमान उंचावत जाणे. राहणीमान उंचावणे किंवा त्यात सुधारणा करत जाणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र ती उत्पन्नातील वाढीला अनुसरून करणे आवश्यक आहे. उत्पन्न मर्यादित प्रमाणात वाढत असूनदेखील ‘ईएमआय’वर अनेक वस्तू मिळतात म्हणून आणि ‘स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग’शी जुळवून घेण्यासाठी खर्चात वाढ होत जाते. बऱ्याचदा गरज नसताना उंची वस्तू म्हणजे महागडे फोन, गॅझेट्ससारख्या वस्तू खरेदी केल्या जातात. वस्तू-सेवा खरेदी करणे चूक आहे का? जीवनशैली सुधारणे आणि चांगले ‘स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग’ कायम राखणे यासाठी आणखी वस्तू-सेवा खरेदी करणे, यात कोणतीही चूक नाही. प्रत्यक्षात, अशा वस्तू खरेदी करण्यासाठी उत्पन्नातदेखील मोठी वाढ करणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता खर्चात वाढ होत जाते. मग, समस्या नेमकी आहे काय? वस्तू खरेदी करणे ही मुख्य समस्या नसून, ‘बजेट’मध्ये न बसणाऱ्या वस्तू खरेदी करणे हीच मुख्य समस्या आहे आणि त्याकडेच दुर्लक्ष होते. जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो त्या वेळी ती वस्तू सर्वोत्तम असावी हा विचार करतो. दुय्यम किंवा कमी दर्जाची वस्तू घेत नाही. व्यवहार म्हणून असे वर्तन अगदी योग्य आहे. मात्र समस्या ही आहे की जे खरेदी कराल ते सर्वोत्तमच असावे, हा अट्टहास. खरेदी करताना नेमकी मानसिकता काय असते? आपल्याला स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास प्रथम आपण ‘बजेट’ निश्चित करतो. साधारणत: आधुनिक स्मार्टफोनचे ‘बजेट’ ३०,००० ते ४०,००० रुपये निश्चित करतो आणि या किमतीतील सर्वोत्तम स्मार्टफोन पर्यायांचा शोध सुरू होतो. आता ई-कॉमर्स कंपन्यादेखील आपल्याला आपले ‘बजेट’ विचारून स्मार्टफोन दाखवतात आणि त्याच वेळी त्यांच्या संकेतस्थळावर इतर कंपन्यांच्या महाग पर्यायांसोबत स्मार्टफोनची तुलना दाखवतात आणि इथून गोंधळ सुरू होतो. दुकानात किंवा संकेतस्थळावर प्रत्यक्ष काय घडते? दुकानात गेल्यानंतर विक्रेता हवा असलेला मोबाइल फोन दाखवितो. मात्र या मोबाइलची खरेदी पूर्ण होण्याआधी दुकानदार ७० हजार रुपयांचा आणखी ‘लेटेस्ट स्मार्टफोन’ दाखवितो. तसेच ई-कॉमर्स कंपनीच्या संकेतस्थळावर क्रेडिट कार्ड वापरून हा फोन घेतल्यास त्यावर इतकी सवलत किंवा ही भेटवस्तू अशी आमिषे दिसत असल्याने ‘बजेट’ वाढत जाते. दुकानदारदेखील म्हणतो की, ‘बजेट’पेक्षा थोडा महाग आहे पण आत्ता पूर्ण पैसे एकदम देण्याची गरज नाही. जर तुम्ही, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर केवळ तीन हजार रुपयांच्या ईएमआयह्णवर स्मार्टफोन तुमचा होईल. त्यामुळे ठरविलेल्या ‘बजेट’पेक्षा अधिक महाग असलेला मोबाइल व्यक्तीला अचानक ‘बजेट’मध्ये बसत असल्याचे पटते. आता व्यक्ती कोणता मोबाइल खरेदी करेल? अनेक जण लेटेस्ट मोबाइल खरेदीला प्राधान्य देतील, बरोबर? आपल्या ‘बजेट’पलीकडील वस्तू खरेदी करण्यास भाग पाडताना मनात नेमके काय सुरू असेल? याचे उत्तर म्हणजे सर्वोत्तम वस्तूशिवाय दुसरी वस्तू खरेदी न करण्याच्या मानसिकतेत आहे. आपण एकदाच वस्तू खरेदी करणार असून, ती सर्वोत्तमच असावी. ती वस्तू आपण वारंवार खरेदी करणार आहोत का? आणि हाच ‘ईएमआय सापळा’ असतो. प्रथम स्वत:ला प्रामाणिकपणे विचारा की, याआधी कितीवेळा बजेटच्या पलीकडील वस्तू याप्रमाणे खरेदी केली आहे. त्यासोबत क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या सोप्या ‘ईएमआय’मुळे अशी खरेदी तुम्ही किती वेळा केली आहे, याचाही विचार करा. पुरेसे कमावूनही पुरेशी बचत करू शकत नाही? होय, क्रेडिट कार्ड आणि ईएमआय संस्कृतीच्या जोरामुळे ‘बकिंगहॅम पॅलेस’ विक्रीला निघाल्यास, तोदेखील खरेदी करू शकता! हे कदाचित गमतीशीर वाटते ना! पण दरमहा केवळ ९,९९९ रुपये भरून आपल्यातील प्रत्येक जण ‘बकिंगहॅम पॅलेस’ नक्की खरेदी करू शकतो, पुढील ५०० वर्षांत! हे आकडय़ाचे गणित तंतोतत जुळत नसले तरी, ‘ईएमआय’बद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल. ‘ईएमआय’मुळे आपल्याला आजूबाजूची प्रत्येक गोष्ट खरेदी करण्याचा आत्मविश्वास येतो. पण ही वस्तू आपल्याला प्रत्यक्षात परवडू शकते का? याचा विचार वस्तूची खरेदी करताना करायला हवाच. क्रेडिट अथवा डेबिट कार्डसचा वापर करण्यात काही गैर नसून, उलट ती रोख जवळ बाळगण्यापेक्षा अधिक सोईची असतात. मात्र क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केल्यास ती फायदेशीर ठरतात. मात्र चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास कर्जाच्या सापळय़ात अडकून आर्थिक आरोग्य बिघडू शकते.