रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी सातत्याने गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर आपलं परखड भाष्य केलं आहे. केंद्र सरकारच्या अनेक अर्थविषयक धोरणांवर त्यांनी टीका केली आहे. नोटबंदीमुळे देशाचं नुकसान झाल्याची भूमिका ते सातत्याने मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या धोरणांनंतर देशवासीयांच्या सद्य परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच, देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी गंभीर शब्दांमध्ये चिंता देखील व्यक्त केली आहे. नलसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉतर्फे आयोजित केलेल्या एका ऑनलाईन कार्यक्रात बोलताना रघुराम राजन यांनी आपली भूमिका मांडली आहे. करोनाकाळात मध्यमवर्गीय गरीब झाले! रघुराम राजन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भूमिका मांडताना करोनामुळे झालेलं नुकसान देखील यावेळी नमूद केलं. "देशाच्या आर्थिक भवितव्यावरचा भारतीयांचा विश्वास गेल्या काही वर्षांत उडू लागला आहे. त्यात करोनामुळे अनेक मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला असून ते अधिकच गरिबीकडे झुकले आहेत. कोविडच्या संकटानं आपला आत्मविश्वास अधिकच कमकुवत केला आहे", असं राजन म्हणाले. "भारतातील शेअर बाजार दिवसेंदिवस मोठमोठाले आकडे दाखवत आहेत. पण हे आकडे भारतीय नागरीक सामना करत असलेल्या समस्या नक्कीच दाखवत नाहीत", असं देखील राजन यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. विकासदराचा अंदाच एक टक्क्याने घटला! नुकताच आरबीआयनं देशाचा विकासदर आधीच्या १०.५ टक्क्यांवरून तब्बल एक टक्क्याने कमी करत ९.५ टक्के इतका अंदाजित केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं देखील हा दर २०२१मध्ये ९.५ तर २०२२ मध्ये त्याहून एक टक्क्याने कमी म्हणजेच ८.५ टक्क्यांवर येण्याच अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थव्यवस्था खालावल्यामुळे लोकशाही मूल्यांना धक्का! दरम्यान, देशाच्या आर्थिक परिस्थितीमुळे लोकशाही मूल्यांना धक्का लागत असल्याचं रघुराम राजन म्हणाले आहेत. "आपल्या अर्थव्यवस्थेची कामगिरी खालावत जात असताना आपली लोकशाही मूल्ये, चर्चा करण्याची आपली तयारी, मतभेदांचा सन्मान करण्याच्या आपल्या तत्वांना देखील धक्का बसतो आहे. हे फक्त केंद्रातच होतंय असं नाही, तर अनेक राज्यांमध्ये हे घडून येतंय. सामाजित भावना फार लवकर दुखावल्या जातात हे तर तुम्हाला माहितीच आहे", असं राजन म्हणाले.