सुधीर जोशी
सध्या जगात एकूणच कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे भांडवली बाजारातही गुंतवणुकीचा अचूक मुहूर्त साधणे कठीण. त्यामुळे अतिसाहस टाळून, संधी मिळेल तशी थोडथोडकीच पण गुंतवणूक करीत राहणे महत्त्वाचे ठरेल..

सरलेल्या सप्ताहात त्याआधीच्या सप्ताहातील सकारात्मक संदेश पुढे नेत बाजाराची सुरुवात आक्रमक झाली. मात्र नंतर बाजार वरची पातळी टिकवू शकला नाही. वायदे बाजाराच्या मासिक सौदापूर्तीचा दबाव, जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावातील घसरण, रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण, सरकारने पेट्रोल, डिझेल उत्पादकांचा अतिरिक्त नफा नियंत्रित करण्यासाठी लावलेला करभार, वाहन विक्रीचे समाधानकारक आकडे, वस्तू व सेवा कर संकलनातील वाढ असे संमिश्र संकेत बाजारावर दोन्ही बाजूंनी परिणाम करणारे ठरले. साप्ताहिक तुलनेत बँकिंग क्षेत्र सोडून सर्वच क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक बंद पातळीवर स्थिरावले आहेत आणि प्रमुख निर्देशांकात माफक वाढ नोंदवण्यात आली.

• एन्डय़ुरन्स टेक्नॉलॉजी : भारतातील दुचाकी वाहनांच्या व्यवसायवृध्दीत सहभागी होण्यासाठी एन्डय़ुरन्स टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करता येईल. ही कंपनी भारतातील दुचाकी व तीन चाकी वाहनांना महत्त्वाचे सुटे भाग पुरविणारी व अॅ.ल्युमिनियम कास्टिंग बनविणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचा युरोपमध्ये मोठा व्यवसाय विस्तार आहे. वाहनांमध्ये अॅतल्युमिनियम कास्टिंगच्या भागांची वाढणारी मागणी व विद्युत वाहनांना वाढती मागणी ही कंपनीच्या उत्पादनांसाठी मोठी संधी आहे. सेमीकंडक्टर चिपच्या तुटवडय़ामुळे वाहन क्षेत्रातील उत्पादनकपातीचा फटका या कंपनीला बसला. तरी देखील मार्चअखेरच्या तिमाहीत कंपनी महसुलात १० टक्के वाढ करू शकली. अर्थव्यवस्थेत येणारी उभारी व खासगी वाहनांना मिळणारी पसंती यामुळे कंपनी परत प्रगतिपथावर मार्गक्रमण करेल. गेल्या वर्षांतील उच्चांकावरून कंपनीचे समभाग ३० टक्क्यांनी घसरले आहेत. १३०० ते १४०० रुपयांच्या पातळीवर कंपनीच्या समभागात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची संधी आहे.

कॉनकॉर : कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात कॉनकॉरने मागील वर्षांत दमदार कामगिरी केली होती. कंपनीच्या देशांतर्गत महसुलात ३२ टक्के तर आयात निर्यात प्रधान महसुलात १२ टक्के वाढ झाली. कंपनीच्या नफ्याचे प्रमाणही वाढते राहिले आहे. रेल्वेने होणाऱ्या कंटेनर वाहतुकीमध्ये मक्तेदारी असल्यामुळे कंपनी वाढता खर्च वाहतुकीचे दर वाढवून वसूल करू शकते. माल वाहतुकीच्या इतर पूरक क्षेत्रातही कंपनी व्यवसाय वाढवत आहे. रेल्वेने वाहतूक करण्यासाठी समर्पित मार्ग तसेच कंटेनरची दुमजली वाहतूक योजना यामुळे वेळेची बचत होऊन रेल्वेने होणाऱ्या मालाच्या वाहतुकीस व्यावसायिकांकडून प्राधान्य दिले जाते आहे. रेवारी-पालनपूर मार्गिकेच्या टप्प्यात याचे परिणाम दिसत आहेत तर लवकरच जेएनपीटी व दादरी ही बंदरे जोडली गेली की कंपनीला अधिक फायदा होईल. सध्याची ६०० रुपयांची भाव पातळी दोन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

बजाज ऑटो : कंपनीने समभागांची पुनर्खरेदी (बायबॅक) योजना जाहीर केली. कंपनी भागभांडवलाच्या १.८८ टक्के समभाग ४,६०० रुपये प्रतिसमभाग या दराने बाजारातून खरेदी करणार आहे. या खरेदीमध्ये गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाही. पण अप्रत्यक्षपणे भांडवल कमी होऊन दीर्घ मुदतीमध्ये गुंतवणूकदारांचा फायदाच होईल. कंपनीने पुनर्खरेदीचे प्रमाण कमी ठेवून पुढील विस्तार योजना व बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांसाठी भांडवल राखून ठेवले आहे. सध्या ३,६०० रुपयांच्या आसपास असणारी समभागांची किंमत दीर्घ मुदतीच्या खरेदीसाठी वाजवी आहे.

परसिस्टंट सिस्टीम्स: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या स्वप्नवत तेजीनंतर हे समभाग १५ टक्क्यांनी खाली आले आहेत. मागील आर्थिक वर्षांत महसुलात झालेल्या ३५ टक्के वाढीतील महत्त्वाचा वाटा कंपनीच्या पारंपारिक व्यवसाय वृध्दीचा होता. मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, सेल्सफोर्ससारख्या कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या क्लॉउड परिसंस्थेशी निगडित सेवा व प्रणाली व्यवसायात परसिस्टंट सिस्टीम्सची आगेकूच सुरू आहे. त्यासाठी मीडिया ॲजिलिटी या गूगल क्लॉउडशी संबंधित महत्त्वाच्या कंपनीचे अधिग्रहण केले होते. डिजिटल अभियांत्रिकी क्षेत्रातील मागणीत मोठय़ा प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. स्वत:जवळील शिल्लक रोख रक्कम वापरून कंपनीने अनेक लहान व्यवसायांचे अधिग्रहण केले आहे. मार्चअखेर कंपनीकडे २,८०० कोटी रुपयांच्या मागण्या शिल्लक होत्या. पुढील एक-दोन वर्षांत कंपनी आठ ते नऊ हजार कोटींच्या महसुलाकडे कंपनी वाटचाल करीत आहे. कंपनीच्या समभागात कोटक म्युच्यल फंडाने एप्रिल महिन्यांत गुंतवणूक वाढविली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभागासाठी या कंपनीचे समभाग जमवणे फायद्याचे ठरेल.

सध्या जगात एकूणच कमालीची अस्थिरता आहे. भू-राजकीय संघर्ष, पुरवठा साखळीतील अडथळे, खनिज तेल तसेच इतर वस्तूंच्या किमतींमधील चढ-उतार, रुपयाचा विनिमय दर या सर्व गोष्टी अनेक पटीने अस्थिर बनल्या आहेत. त्यामुळे भांडवली बाजारातही गुंतवणुकीचा अचूक मुहूर्त साधणे कठीण आहे. एकरकमी गुंतवणूक कारण्यापेक्षा चांगल्या व्यवसायातील नामवंत कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हाच उत्तम मार्ग आहे.
sudhirjoshi23@gmail.com