Chandra Grahan Time & Sutak Kaal: २०२६ सालची होळी अनेक कारणांनी खास मानली जात आहे. या वर्षी रंगांच्या सणासोबत एक महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे. २ मार्चला होलिका दहन होईल आणि ३ मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागेल.
ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे याचा परिणाम देश आणि जगाबरोबर सर्व १२ राशींच्या लोकांवर होऊ शकतो.
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या काळात सुतक लागते. या वेळी मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि पूजापाठ टाळला जातो. म्हणूनच लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, जसे की होलिका दहनाचा योग्य वेळ कोणता आहे, चंद्रग्रहण कधी लागेल आणि त्याचा जास्त परिणाम कोणत्या राशींच्या लोकांवर होईल. तर या लेखातून सोप्या भाषेत समजून घेऊ या…
पंचांगानुसार या वर्षी २ मार्च रोजी होलिका दहन होणार आहे. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. या दिवशी संध्याकाळी होलिकेची पूजा केल्यानंतर अग्नी प्रज्वलित केला जातो आणि लोक आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. या दिवशी अनेक लोक स्नान आणि दानही करतात.
३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण
ज्योतिषीय गणनेनुसार ३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होईल, असे सांगितले जात आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे; तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो.
ज्योतिषांच्या मते, या ग्रहणाचा परिणाम प्रशासन, हवामान आणि आर्थिक व्यवहारांवरही होऊ शकतो. मात्र, वैज्ञानिक दृष्टीने चंद्रग्रहण ही एक सामान्य खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा चंद्रग्रहण लागते.
चंद्रग्रहण आणि सुतक काळाची वेळ (Chandra Grahan Start & End Time, Sutak Kaal Time)
धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या सुमारे नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो.
सुतक काळ सुरू: ३ मार्च सकाळी सुमारे ६:२० वाजता
चंद्रग्रहण सुरू: दुपारी सुमारे ३:२० वाजता
ग्रहणाचा मध्य काळ: सायंकाळी सुमारे ५ वाजता
ग्रहण समाप्त: सायंकाळी सुमारे ६:४५ वाजता
ग्रहण संपल्यानंतर अनेक ठिकाणी स्नान करणे आणि दान देण्याची परंपरा आहे.
भारतामध्ये ३ मार्च २०२६ रोजी होणारे चंद्रग्रहण पूर्णपणे दिसणार नाही. कारण- ग्रहणाचा बराचसा भाग तेव्हा होईल, जेव्हा भारतात चंद्र उगवलेला नसेल. म्हणून भारतातील लोकांना या ग्रहणाचा फक्त शेवटचा टप्पा (अंतिम भाग) पाहता येईल.
भारतामध्ये बहुतेक ठिकाणी चंद्र सायंकाळी सुमारे ६:१० ते ६:२० च्या दरम्यान उगवतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर थोड्या वेळासाठी ग्रहणाचा शेवटचा भाग दिसू शकतो. विशेषतः पूर्व भारत आणि ईशान्य राज्यांमध्ये ते जास्त स्पष्टपणे दिसण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
