Dussehra 2022: बुद्धिमान असूनही अहंकाराने ज्याला राक्षसी ओळख दिली अशा लंकापती रावणाचा अंत हा हिंदू धर्मीयांमध्ये सणासारखा साजरा केला जातो. रावणाने आपल्या आययुष्यात अनेक युद्ध लढली त्यातील प्रत्येक युद्धात तो अपराजित राहिला. मात्र श्रीरामासह रावणाचा निभाव लागू शकला नाही व त्याचा अंत झाला. पौराणिक कथांनुसार रावणाच्या विनाशाला केवळ रामच नव्हे तर अन्यही व्यक्ती निमित्त ठरल्या होत्या. शक्ती व बुद्धीच्या अहंकाराने पेटलेल्या रावणाने अनेकांची मने दुखावली होती आणि या कर्माचे फळ त्याला मिळालेच. प्रभू श्रीरामाच्या हातून वध झालेल्या रावणाला किती जणांनी व का शाप दिले होते जाणून घेऊयात… रामायणात नमूद केल्याप्रमाणे रावणाने पूर्वजन्मापासून सीतेवर वाईट दृष्टी टाकली होती. ज्यामुळे माता सीतेने रावणाला शाप दिला होता. सीतेचा जन्म तेव्हा लक्ष्मीच्या अंशातून झाला होता व तिचे नाव वेदवती होते. पौराणिक कथांमधील दाखल्यांनुसार, एकदा रावण महादेवांच्या भेटीसाठी कैलासावर गेला होता. तेव्हा त्याने दारातील नंदीची थट्टा केली व त्याला माकडासारखा दिसणारा म्हणत खिल्ली उडवली. यावरून संतप्त नंदीने रावणाला तुझा सर्वनाश हा माकडांमुळेच होईल असा शाप दिला होता. हनुमानाच्या वानरसेनेचा रावणाच्या विनाशात मोठा वाटा होता. श्रीरामाच्या वंशातील राजे अनवरण्य यांच्याशी एकदा रावणाचे युद्ध झाले होते, या युद्धात रावणाने विजय मिळवला असला तरी अनवरण्य राजाने मृत्यूच्या वेळी शेवटच्या शब्दात रावणाला शाप दिला होता. माझ्याच वंशातील युवक तुझा नाश करेल असा शाप रावणाला रामाच्या रूपात भोवला. Dussehra 2022: दसरा व विजयादशमी मध्ये आहे मोठा फरक; सरस्वती पूजन की शस्त्रपूजा, नेमकं शास्त्र काय? रावणाने आपला भाऊ कुबेर याच्या मुलाची पत्नी अप्सरा रंभा हिच्यावरही जबरदस्ती केल्याचे म्हंटले जाते. अप्सरेच्या विनावणीला न जुमानता रावणाने केलेलं कृतयु जेव्हा कुबेराचा पुत्र नल कुबेर याला समजले तेव्हा त्याने रावणाला तुझा मृत्यू स्त्रीमुळेच होईल व तू पुन्हा कोणत्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिल्यास तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील असा शाप दिला होता. रावणाची बहीण शूर्पणखा हिचे पती विद्युतजिह्वा हे राजा कालकेय यांच्या सैन्याचे सेनापती होते, जेव्हा रावणाने कालकेयसह युद्धात विद्युतजिह्वाचा वध केला तेव्हा शूर्पणखेने भावाला असा शाप दिला की माझ्यामुळेच तुझा मृत्यू ओढवेल. रावणाने मंदोदरीच्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच माया हिचे सतीत्व भंग करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिनेही तुझा मृत्यू स्त्रीमुळे होईल असा शाप रावणाला दिला होता. (टीप- वरील लेख हा गृहीतके व सामान्य माहितीवर आधारीत आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)