भारत आणि चीन.. भाषा, संस्कृती, राजकीय विचार यांच्याबाबतीत परस्परांहून भिन्न असलेले दोन शेजारी देश. अशी भिन्नता असली तरी गेल्या अडीच हजार वर्षांपासून या दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. भारत व चीनमधील १८ तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असणारं हे पुस्तक त्याची आठवण करून देतंच, शिवाय भारत-चीन संबंधांना संघर्षांची किनार जणू अटळपणे जोडली जात असताना दोन्ही देशांमध्ये संघर्षांऐवजी सहकार्य व स्पर्धेची गरजही अधोरेखित करतं..

चीन हा फक्त भारताचा महाकाय शेजारी देश नाही, तर सदैव युद्धाच्या सावलीत जगत असलेल्या पूर्व आशियातील महत्त्वाचा घटक आहे. पूर्व आशियाच्या सत्तासंतुलनात मागील दहा वर्षांपासून भारताने स्वत:चे स्थान तयार केले आहे. पूर्व आशियात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता अनेक कारणांनी अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. जपानमध्ये शिंझो अ‍ॅबे यांचे नेतृत्व बळकट झाल्याने आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाविरुद्ध उघडलेल्या मोहिमेने युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. युद्ध सुरू झालेच, ज्यामध्ये चीनचा सहभाग अनिवार्य असणार आहे, तर भारताने चीनवर दुसऱ्या बाजूने लष्करी दबाव निर्माण करावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. भारत या प्रकारची कृती करण्याची शक्यता चीनने गृहीत धरली असून पाकिस्तानद्वारे भारतावर दबाव ठेवण्याची खेळी चीनने तयार केली आहे. या वातावरणात भारतीय जनमानसाने चीनकडे शत्रुत्वाच्या भावनेतून बघणे साहजिक आहे. मात्र वास्तव अधिक क्लिष्ट आहे.

भारत आणि चीन यांच्यातील संबंधांचा इतिहास, दोन्ही देशांच्या संस्कृतीतील समान धागे, विविध क्षेत्रांतील सहकाराच्या शक्यता आणि शक्तिशाली होण्याच्या लालसेतून उत्पन्न झालेली स्पर्धा या सर्वाचा कस काढल्यास दोन्ही देशांतील शत्रुत्व आभासी असल्याचे चित्र उभे राहते. भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारल्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेचा, सामाजिक बदलांचा आणि त्या देशाच्या दूरगामी भूमिकेचा अभ्यास करणे अपरिहार्य झाले होते. सन २००० मध्ये अमिताभ मट्ट आणि कांती बाजपाई संपादित ‘पिकॉक अ‍ॅण्ड ड्रॅगन : इंडिया-चायना रीलेशन्स इन ट्वेन्टी फर्स्ट सेन्च्युरी’ या पुस्तकात दोन्ही देशांतील संबंधांचा अर्वाचीन इतिहास, विद्यमान परिस्थिती आणि भविष्यातील संभावना यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले होते. भारताची अण्वस्त्र चाचणी, कारगिल युद्ध, चीनने हाँग काँग व मकाऊवर मिळवलेला सार्वभौम हक्क या घटनांच्या पाश्र्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचे होते. भारताला मोराची आणि चीनला ड्रॅगनची उपमा देऊन दोन्ही देशांच्या दृष्टिकोनाबद्दल संपादकांनी बरेच काही सांगितले होते. मोर स्वत:च्या सौंदर्याने आणि कलागुणांनी जगाचे लक्ष आकर्षित करतो, तर ड्रॅगन विखारी श्वासांनी जगात दहशत पसरवतो. मात्र ड्रॅगन हा एक प्रकारचा साप आहे आणि मोर चपखलपणे सापाची शिकार करू शकतो, असा या पुस्तकाच्या संपादकांचा सूर होता. भारताच्या अण्वस्त्र चाचणीनंतर आणि चीनने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारल्यानंतर जागतिक समूहाने दोन्ही देशांतील संबंध, विविध बाबींकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि विविध क्षेत्रांत दोन्ही देशांची तुलनात्मक प्रगती तपासण्यात रुची घेणे सुरू केले. ‘द इंटरनॅशनल पीस अकॅडेमी’ आणि ‘द मॉनेटरी इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ यांच्या सहकार्याने वाहेगुरू पाल सिंग सिद्धू व जिंग डोंग युआन संपादित ‘इंडिया अ‍ॅण्ड चायना : को-ऑपरेशन ऑर कॉन्फ्लिक्ट?’ हे पुस्तक सन २००३ मध्ये प्रकाशित झाले. भारत व चीन संबंधांना केवळ संरक्षण व सुरक्षेच्या चष्म्यातून न बघता त्यापलीकडे जाण्याची गरज या काळातच निर्माण झाली होती. सन २००१ मध्ये, ज्या वेळी भारत व चीन द्विपक्षीय राजनयिक संबंधांची सुवर्णजयंती साजरी करत होते, प्रा. गो. पु. देशपांडे व डॉ. अलका आचार्य संपादित ‘क्रॉसिंग अ ब्रिज ऑफ ड्रीम्स : फिप्टी इयर्स ऑफ इंडिया-चायना’ हे पुस्तक तुलिका प्रकाशनाने प्रकाशित केले होते. या संपादित पुस्तकाने दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा पाया रचला होता. या पुस्तकात ‘अर्थव्यवस्था व जागतिक व्यापार’, ‘राजकारण व समाज’, ‘संरक्षण व सुरक्षा’ आणि ‘परराष्ट्र धोरण व जागतिक व्यवस्था’ या चार विभागांमध्ये विषयांची मांडणी करण्यात आली होती. यानंतर अनेक संपादित पुस्तकांमधून या चार विभागांशी संबंधित तज्ज्ञांनी भारत व चीन यांच्याविषयी मतमतांतरे मांडली आहेत. सन २००५-०६ मध्ये विद्यमान राज्यसभा खासदार डी. पी. त्रिपाठी संपादित ‘िथक इंडिया’ त्रमासिकाच्या विशेष अंकात भारतीयांचा चीनविषयीचा दृष्टिकोन, प्राचीन ते अर्वाचीन संबंध आणि सुरक्षाविषयक मुद्दय़ांचा ऊहापोह करण्यात आला होता. याचप्रमाणे सन २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या डॉ. हर्ष पंत संपादित ‘द राइज ऑफ चायना : इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया’ या पुस्तकातून दोन्ही देशांमध्ये घडत असणाऱ्या आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेत द्विपक्षीय संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला होता.

याच श्रेणीतील अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाचे योगदान म्हणून ‘चायना अ‍ॅण्ड इंडिया : हिस्टरी, कल्चर, को-ऑपरेशन अ‍ॅण्ड कॉम्पिटीशन’ या नव्या संपादित पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. भारत आणि चीनमधील १८ तज्ज्ञांनी विविध मुद्दय़ांवर या पुस्तकात चिंतन केले आहे. भारत व चीनदरम्यानचे प्राचीन, मध्ययुगीन ते अर्वाचीन सांस्कृतिक संबंध; दोन्ही संस्कृतींमधील फरक आणि त्याचा पर्यटन क्षेत्र, सॉफ्ट पॉवर प्रक्षेपणाच्या योजना व बीसीआयएम (बांगलादेश-चीन-इंडिया-म्यानमार) महामार्गासंबंधीचा दृष्टिकोन; भारत-चीन-अमेरिका-पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील गुंतागुंतीचे सामरिक राजकारण व त्यातील सामंजस्याच्या शक्यता हा या पुस्तकाच्या पहिल्या भागाचा कॅनव्हास आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात एकूण पाच क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी अवलंबिलेल्या धोरणांचा तुलनात्मक परामर्श घेण्यात आला आहे. जागतिकीकरण, प्रादेशिक असमतोल, औद्योगिक उत्पादन, आरोग्य व्यवस्था व कॉर्पोरेट सामाजिक दायित्व(सीएसआर) अशी ही पाच क्षेत्रे आहेत.

पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात दोन्ही देशांतील प्राचीन सभ्यतांचा व्यापक युरेशियन सभ्यतेवरील प्रभाव चर्चिला गेला आहे. दोन्ही सभ्यतांमधील भिन्नता आणि त्यातून दोन्ही प्रदेशांमध्ये निर्माण झालेल्या वेगळ्या अर्थव्यवस्थांचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात या दोन प्राचीन सभ्यतांमधील देवाणघेवाणीची चर्चा करण्यात आली आहे. चीनच्या ‘शु’कालीन (प्राचीन चिनी राज्य) सभ्यतेतील व्यापाऱ्यांनी भारतीय उपखंडात प्रस्थापित केलेल्या व्यापारी संबंधांवर या प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला आहे. आजच्या ‘सिल्क रोड’ची जागतिक राजकारणात चर्चा आहे, त्याच्या प्राचीन स्वरूपाशी भारताचा असलेला संबंध या प्रकरणात अधोरेखित करण्यात आला आहे. प्राचीन संबंध आणि भौगोलिक जवळीक असूनसुद्धा दोन्ही देशांदरम्यान पर्यटन क्षेत्राचा अपुरा विकास होण्याच्या कारणांचा ऊहापोह तिसऱ्या प्रकरणात घेण्यात आला आहे. पुस्तकाचे चौथे प्रकरण कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्यावर केंद्रित आहे. टागोरांनी भारत-चीन मत्रीचा ध्यास आयुष्यभर जपला होता. दोनदा त्यांनी चीनचा प्रदीर्घ दौरा केला होता, ज्यातून त्यांना भारत व चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या तत्त्वज्ञानातून पाश्चिमात्य भांडवली सभ्यतेला पर्याय दिसू लागला होता. हा पर्याय सदृढ करण्याच्या उद्देशाने त्यांनी विश्वनिकेतनमध्ये चीनला समर्पित ‘चायना भवन’ची स्थापना केली होती. आजच्या काळात टागोरांच्या विचारातून भारत व चीनमध्ये संवेदनशील नेतृत्व, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व आणि मानवी क्षमतांचा विकास कशा पद्धतीने करता येईल, यावरसुद्धा चिंतन करण्यात आले आहे. पुस्तकाच्या पाचव्या प्रकरणात दोन्ही देशांमध्ये १५ व्या शतकात वाढीस लागलेल्या धार्मिक संस्कृतींचा शोध घेण्यात आला आहे. या काळात पाश्चिमात्य धर्मप्रसारक आणि पाश्चिमात्य व्यापारी हे मोठय़ा प्रमाणात दोन्ही देशांतील दुवा झाले होते. याशिवाय, सीमावर्ती भागातील व्यापार आणि छोटय़ा-छोटय़ा स्वतंत्र राज्यांचे दोन्ही देशांतील साम्राज्यांशी असलेले संबंध हासुद्धा मध्ययुगीन काळातील महत्त्वाचा कालखंड होता. दोन्ही देशांत आज असलेल्या सीमावादाची मुळे या कालखंडापर्यंत पसरलेली आहेत.

पुस्तकाचे सहावे प्रकरण अनेक अर्थानी महत्त्वाचे आहे. या प्रकरणात भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ (अर्थ-सांस्कृतिक शक्ती) म्हणून झालेल्या प्रगतीची  चर्चा  केली आहे. २१ व्या शतकात कित्येक क्षेत्रांमध्ये चीनने भारतावर निर्विवाद आघाडी घेतली असली तरी स्वत:चा सांस्कृतिक प्रभाव जगावर पाडण्यात हे बलाढय़ राष्ट्र अपयशी ठरले आहे. याउलट, भारताचा सांस्कृतिक प्रभाव कळत-नकळत अनेक भू-सामरिक प्रदेशांमध्ये पसरला आहे. आग्नेय आशियातील काही भागांमध्ये चिनी भाषिकांची संख्या लक्षणीय असली तरी तेथील सभ्यतेवर भारताचा प्रभाव स्पष्ट आहे. रामायण-महाभारतातील मिथकांची लोकप्रियता, या प्रदेशांतील तमिळ भारतीय वंशाची लक्षणीय संख्या आणि बौद्ध धर्माला प्राप्त झालेले संस्थात्मक स्वरूप इत्यादी कारणांनी आग्नेय आशियावर भारतीय छाप स्पष्ट दिसते. मध्य आशियातील इस्लामिक गणराज्यांमधील सामान्य लोकांनासुद्धा भारतीय कला, संगीत, चित्रपट यांचे प्रचंड वेड आहे. आर्थिकदृष्टय़ा हा भूभाग चीनशी अधिक संलग्न असला तरी चिनी जनता आणि मध्य आशियातील मुस्लिमांची नाळ जुळणे कठीण आहे. हीच बाब पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण यांच्याबाबतही लागू होते. आज आफ्रिकेत चीनचे आर्थिक साम्राज्य उभे राहत असले तरी सांस्कृतिक प्रभाव नगण्य आहे. पुढील तीन प्रकरणांमध्ये भारत व चीनचे सद्य:स्थितीतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे डावपेच चर्चिले आहेत. विशेषत: भारताच्या वायव्येला पाकिस्तान व अफगाणिस्तान आणि आग्नेयेला बांगलादेश व म्यानमार या देशांना आपल्या प्रभावक्षेत्रात आणण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या (सी-पेक) माध्यमातून चीनने पाकिस्तानला जवळपास वश केले आहे. मात्र भारताने बांगलादेश-चीन-इंडिया-म्यानमार (बीसीआयएम) आíथक महामार्गाला सहमती दिलेली नाही. चीनचा ‘वन बेल्ट-वन रोड’ प्रकल्प आणि अमेरिकेचा ‘पिवोट टू एशिया’ प्रकल्प या संदर्भात भारतीय परराष्ट्र धोरणापुढील आव्हानांवर या प्रकरणांमध्ये प्रकाश टाकला आहे.

पुस्तकाच्या १० व्या प्रकरणात जागतिकीकरणाला भारत व चीनने कशा पद्धतीने प्रतिसाद दिला याचे तुलनात्मक विवेचन आले आहे. ११ व्या प्रकरणात आर्थिक सुधारणांचा दोन्ही देशांतील प्रादेशिक असमतोलावर झालेला परिणाम आणि उपाययोजनांची तुलनात्मक चर्चा करण्यात आली आहे. पुस्तकाच्या १२ व्या प्रकरणात ‘मेड इन चायना’च्या यशामागील कारणे आणि ‘मेक इन इंडिया’पुढील आव्हानांची सखोल चर्चा वाचण्यास मिळते. दोन्ही देशांतील अर्थव्यवस्थांच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकल्यास उत्पादन क्षेत्रात चीनला, तर सेवा क्षेत्रात भारताला साहजिक आघाडी असल्याचे लक्षात येते. मात्र उत्पादन क्षेत्रात नाव कमावल्याखेरीज ‘जागतिक शक्तीचा’ मान मिळणे शक्य नसल्याची जाणीव भारताला आहे. उत्पादनातून निर्मित रोजगार आणि निर्यात याखेरीज प्रबळ अर्थव्यवस्था निर्माण होणे शक्य नाही. पुस्तकाच्या १३ व्या प्रकरणात दोन्ही देशांतील ‘कॉर्पोरेट सामाजिक दायित्व’ या संकल्पनेचे विवेचन करण्यात आले आहे. दोन्ही देशांना या क्षेत्रातसुद्धा एकमेकांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. पुस्तकाच्या शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये दोन्ही देशांतील आरोग्य क्षेत्राचा परामर्श घेण्यात आला आहे. दोन्ही देशांतील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आरोग्य क्षेत्राच्या विकासावर झालेला परिणाम, तसेच या क्षेत्रातील कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाचा अभ्यास या प्रकरणात करण्यात आला आहे.

पुस्तकाच्या नावातच संघर्षांऐवजी सहकार्य व स्पध्रेचा उल्लेख असल्याने या दुसऱ्या भागातील लेखांचा सूर एकमेकांना समजून घेण्याकडे आणि एकमेकांपासून शिकण्याकडे अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे काही लेखांमध्ये चिनी तज्ज्ञांनी भारतातील व्यवस्थेचे विश्लेषण केले आहे, तर काही लेखांमध्ये भारतीय तज्ज्ञांनी चीनमधील परिस्थिती व चीनच्या दृष्टिकोनाचे विश्लेषण केले आहे. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेतील फरक आणि त्यामागील सामाजिक-सांस्कृतिक कारणांचा शोध घेत दोन्ही देशांतील राजकीय व सामरिक संबंधांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. पुस्तकाच्या संपादकांमधील परामिता मुखर्जी या कोलकातास्थित इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट इथे, तर अर्णब के. देब हे दिल्लीस्थित इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमध्ये कार्यरत आहेत. पुस्तकाच्या तिसऱ्या संपादक मिओ पांग या चीनच्या सिचुयान प्रांतातील सिचुयान अकॅडेमी ऑफ सोशल सायन्स या संस्थेत संशोधन विभागाच्या उपसंचालक आहेत. दोन्ही देशांतील अभ्यासकांमध्ये या पातळीवर सामंजस्य प्रस्थापित होऊन त्यांनी एकत्रित काम करणे हा भारत-चीन सांस्कृतिक संबंधातील नवा अध्याय असून या प्रकारचे प्रकल्प सातत्याने राबवले जाणे आवश्यक आहे.

परिमल माया सुधाकर – parimalmayasudhakar@gmail.com