जैतापूर किंवा राफेलसारख्या विषयांत फ्रान्स-भारत सहकार्याबद्दल फार बरं बोललं गेलं नसेलही; पण ग्रंथव्यवहारात मात्र हे सहकार्य सर्वार्थानं ‘साजरं’ होणार आहे! पॅरिसमध्ये पुढल्या वर्षी, २० ते २३ मे २०२० असे चारही दिवस भरणाऱ्या प्रचंड पुस्तक-मेळ्यात भारत हा ‘अतिथी देश’ असणार आहे. फ्रेंचमध्ये या ग्रंथमेळ्याला ‘सलाँ दु लिव्रे’ म्हटलं जातं. किमान ४५ देशांमधले १२०० तरी प्रकाशक यात भाग घेतात, शिवाय ८०० परिसंवाद किंवा साहित्य-आधारित कार्यक्रम आणि ३०० लेखकांचे स्वाक्षरी-सोहळेही दरवर्षी या मेळ्यात होत असतात. गेल्याच महिन्यात २०१९ मधलं ‘सलाँ दु लिव्रे’ पार पडलं, तेव्हा ओमानला पाहुण्या देशाचा मान मिळाला होता. ओमानपेक्षा भारताचा सहभाग कैकपटींनी सशक्त असू शकतो!

त्यापुढली बातमी अशी की, २०२२ च्या जानेवारीत नवी दिल्लीत होणाऱ्या ‘विश्व पुस्तक मेळ्या’चा अतिथी देश फ्रान्स असेल. हे साटंलोटं- किंवा राजनैतिकदृष्टय़ा योग्य शब्द वापरायचे तर, ‘द्विपक्षीय सहकार्य’ ग्रंथव्यवहाराला कसं बळ देणार, अशी शंका असलेल्यांना काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. भारतीय भाषांपैकी एकटय़ा मराठीचा विचार केला, तरी ‘बलुतं’पासून ‘आमचा बाप आन आम्ही’पर्यंत अनेक पुस्तकं फ्रेंच भाषेत उपलब्ध आहेत. पुण्यातून फ्रेंच पुस्तकांचे थेट मराठी अनुवाद प्रकाशित होताहेत.. अशा किमान २३ भारतीय भाषा, शिवाय इंग्रजी.. असा पसारा असलेल्या भारताशी ग्रंथसहकार्य करणं कोण नाकारू शकेल! नॅशनल बुक ट्रस्ट ही भारताच्या ग्रंथव्यवहाराचा आंतरराष्ट्रीय समन्वय साधणारी संस्था त्यामुळेच महत्त्वाची ठरते.

अर्थात, भारतीय पुस्तकांपैकी इंग्रजीचा खप देशव्यापी मानला जात असला तरी, सरासरीनं इंग्रजी पुस्तकांच्याही फार तर ३००० प्रती खपतात, हा दोष प्रकाशकांचा नसून वाचकांचाही आहे.