आधी शिवसेनेच्या गिरणी कामगार सेनेच्या पुढाकारानं सुरू झालेल्या मुंबईच्या गिरणी कामगारांच्या संपाचं नेतृत्व कामगारांच्या आग्रहाखातर डॉ. दत्ता सामंतांकडं आलं. आणि मग १९८२ च्या १८ जानेवारीला व्यापक मागण्यांनिशी ऐतिहासिक संपाची घोषणा झाली. पन्नासहून अधिक गिरण्यांमधील सुमारे अडीच लाख कामगार त्यात सहभागी झाले. संप दीर्घकाळ चालला. गिरणी कामगारांचं देशोधडीला लागणं हे त्यानंतरचं वास्तव. त्या वास्तवाचा वेध घेणारं ‘द १९८२-८३ : बॉम्बे टेक्स्टाइल स्ट्राइक’ हे पुस्तक ‘स्पीकिंग टायगर’ प्रकाशनानं अलीकडेच प्रसिद्ध केलं आहे.

हब वान वर्श हे त्याचे लेखक. सामाजिक मानववंशशास्त्र या विषयाचे अभ्यासक असले, तरी ते कवी आहेत, अनुवादक आहेत. गिरणी कामगारांच्या संपाचा संशोधनात्मक अभ्यास त्यांनी १९९० च्या दशकातच केला. गिरणी संपाचा अभ्यास करण्याचा तो पहिला संशोधनात्मक प्रयत्न. हे पुस्तक त्यातून आकाराला आलं आहे. त्याला ताज्या अभ्यासाची, अनुभवकथनांची आणि निरीक्षणांची जोड त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे ‘जावई’ असलेले  हब वान वर्श १९७२ पासून सातत्यानं भारतात येतात. गिरणी संपाच्या आधीची आणि नंतरची मुंबई त्यांनी पाहिली आहे. त्यामुळे नारायण सुव्र्याच्या कवितांतलं गिरणगाव त्यांनी जसं पाहिलं, तसंच ‘निर्मून धन आम्ही सारं। मालक असून झालो चोर।’ हे कामगारांचं म्हणणंही ऐकलं आहे. मुख्य म्हणजे, या संपावर घेतले जाणारे अनेक आक्षेप त्यांनी खोडून काढले आहेत. उदाहरणार्थ, ‘कामगारांचा हा संप हिंसकच होता’ या म्हणण्याला छेद देणारी मांडणी वर्श यांनी केली आहे.