शहरापासून जवळच असलेल्या गडदेवदरी शिवारात १४ मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी काही मोर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले होते. गावातील दत्ता आवाड यांनी वनविभागास याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभाग व पक्षिमित्रांच्या चमूने तत्काळ धाव घेऊन पाहणी केली असता, वेगवेगळ्या ठिकाणी १४ मोर मृत झाल्याचे आढळून आले. यामध्ये १० लांडोर व चार मोरांचा समावेश आहे. गडदेवदरी भागातील मोर बेशुद्ध पडल्याची घटना कळताच वन अधिकारी व्ही. एम. दौंड व त्यांचे सर्व कर्मचारी गडदेवदरी येथे पोहोचले. त्या परिसरात पाहाणी केली असता १४ मोर मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. दोन बेशुद्ध मोरांना उस्मानाबाद शहरातील दवाखान्यात नेऊन उपचार करून वाचवण्यात वनविभागाला यश आले आहे. खाल्लेल्या विषारी धान्यांमुळे पोट फुगून त्यांना विषबाधा झाली असल्याचे प्रथम दर्शनी दिसले. मोर मेलेल्या ठिकाणी मका, ज्वारी आढळून आली आहे. त्यांचे नमुनेही घेण्यात आले आहेत. कोणीतरी सराईताने रेकी करून मुद्दामहून मोर वास्तव्यास असलेल्या ठिकाणी हे विषारी औषध घातलेले धान्य ठेवले आहे. ते खाल्ल्यानेच मोर मृत झाल्याचे दौंड यांनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या वेळी प्रा. मनोज डोलारे, प्रशांत पाटील, नेताजी राठोड व गडदेवदरी गावातील तरुणांनी मोरांना वाचविता येईल का, यासाठी प्रयत्न केले.