धर्म, जात आणि पंथाच्या पलिकडे जाऊन आपण सारे एक आहोत, अशी भावना निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. त्यातूनच सक्षम राष्ट्रनिर्मिती होते, असे मत पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या वतीने ज्ञानरत्न आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते के. टी. पाटील, एम. डी. देशमुख तसेच माजी आमदार सिद्रामअप्पा आलुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाभरातील जवळपास ५५ शाळांचा ज्ञानरत्न आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर आमदार मधुकर चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, आमदार बसवराज पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बी. व्ही. मोतीपवळे, विश्वास शिंदे, माजी आमदार सिद्रामअप्पा आलुरे गुरुजी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘जीवन कसे जगावे, असे शिक्षण देण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. सातत्याने सामाजिक संकटांमध्ये भर पडत आहे. हे वाढण्याचे कारण म्हणजे आज कुठली शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठातून जीवन कसे जगावे, याचे शिक्षण दिले जात नाही,’ असे चाकूरकर म्हणाले.