शहरातील ९१ बुद्धविहार अनधिकृत ठरवून हटविण्याच्या यादीत टाकल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय अत्याचारविरोधी समितीने सोमवारी विभागीय आयुक्तालयावर शांती मोर्चा काढला. मोर्चात १० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.
महापालिकेने कोणालाही विश्वासात न घेता धार्मिक स्थळांची यादी बनविली. अनधिकृत ठरवून हटविण्याच्या यादीत टाकलेले ९१ बुद्धविहार वाहतुकीस अडथळा आणत नाहीत. बुद्धविहार विकासासाठी महापालिकेनेही खर्च केला. चुकीचे सर्वेक्षण करून बनविलेल्या यादीवर आक्षेप असल्याचे भदंत चंद्रबोधी, भदंत नागसेन बोधी यांनी या वेळी सांगितले. क्रांती चौक ते आयुक्त कार्यालयादरम्यान निघालेल्या मोर्चादरम्यान त्रिशरण-पंचशील म्हणत अनेक जण सहभागी झाले. आयुक्त कार्यालयात निवेदन घेण्यास वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने सर्वपक्षीय दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते नाराज झाले. अखेर जिल्हाधिकारी निधी पांडेय यांना निवेदन स्वीकारण्यास पाठविण्यात आले.