औरंगाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रक आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. वैजापूरनजीक अंबेवाडी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रक व कारची जोरदार धडक झाली. अर्जुन सोनवणे (बिलोनी, ता. वैजापूर), संतोष वाणी (वैजापूर) व वैभव पुंडे (शिर्डी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील कारवाई सुरू आहे.

कार बिलोनीकडे येत होती, तर ट्रक वैजापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की, कार ट्रकच्या आतमध्ये जवळपास तीन फूट घुसली होती. त्यामुळे कारमधील ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर वैजापूर -औरंगाबाद महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.