राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सवाल भाजपचे सरकार एकीकडे राज्यावर कर्ज असल्याचे सांगते, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या प्रश्नाला बगल देते. मग जगाचा पोशिंदा उपाशी मरत असताना बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गाच्या घोषणा कशाला केल्या जात आहेत? साखर कारखाना चालवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. आता सभासदांना कारखान्याचा अध्यक्ष दिल्लीचा, की गल्लीचा निवडायचाय? याची वेळ आली असल्याचे उद्गार अजित पवार यांनी काढले. वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचे नारळ बाराशिव हनुमान येथे मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या हस्ते फोडण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्राताई वाघ, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमरसिंह पंडित, जयदेव गायकवाड आदींची उपस्थिती होती. अजित पवार म्हणाले, सहकारी कारखानदारी चालवणे हे काही येडय़ागबाळय़ाचे काम नाही. यापूर्वी पूर्णा कारखाना १९९५ मध्ये सभासदांनी दुसऱ्याच्या हाती दिला होता तेव्हा १८ कोटींचे कर्ज त्यावर झाले. तर ८५० ऐवजी ४६० रुपये ऊसदर मिळाला होता. आता पुन्हा काही लोक कारखान्याची सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. सभासद म्हणून त्यांना तो अधिकार आहे. परंतु कारखाना चालवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज लागते. सभासदांनी दांडेगावकर यांच्या हाती सत्ता दिल्याने ७ कोटींच्या भांडवलावर उभा केलेला कारखाना आज संपूर्ण कर्जाची फेड करून ३५० कोटी भागभांडवलावर उभा असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारचे धोरण हे शेतकरीविरोधी आहे. विरोधी पक्षातर्फे संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. इतकेच नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडले असता सरकारने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांना निलंबित केले. राज्यात आघाडी सरकार असताना यांनीच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची आश्वासने दिली, मात्र सर्वच शेतमालाचे भाव गडगडले. तूर खरेदीची घोषणा केली, परंतु ती खरेदी करताना वारंवार बंद पडली. विकलेल्या तुरीचे दाम शेतकऱ्यांच्या हाती पडले नाहीत. विदेशातून ५ लाख मे. टन साखर आयात केली. आज देशातील साखर गोदाम पडून असल्याचा आरोप करून नोटाबंदी, विकास दर, शेतमालाचे भाव या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. ज्या दांडेगावकरांनी अॅड. शिवाजीराव जाधव यांना मोठे केले, आज तोच वकील पूर्णा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जेव्हा, की टोकाई कारखाना सभासदांनी त्यांच्या ताब्यात दिला. मात्र टोकाईचे टोक कसे आहे, हे समजल्यावर त्यांनी टोकाईचा राजीनामा दिला आणि पूर्णा ताब्यात घेण्यासाठी निवडणूक मदानात उतरले आहेत. कारखाना चालवणे म्हणजे न्यायालयातील खटला जिंकण्याइतके सोपे नाही. दांडेगावकरांच्या नेतृत्वामुळे एका कारखान्याचे दोन कारखाने झाले. त्यांच्याकडे टोकाई कारखाना आहे. तो त्यांनी नीट चालवावा, असा टोलाही त्यांनी अॅड. जाधव यांना लगावला.