शहरातील हर्सूल कारागृह परिसरात २९ जणांना करोनाबाधा झाली असून शनिवारी अचानक ९० रुग्णांची वाढ झाली. तसेच आज दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा ९८ झाला आहे.

एका बाजूला शहरातील दुकाने उघडण्याची प्रक्रिया सुरू असताना झालेली ही रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या विविध रुग्णालयात ६८६ रुग्ण उपचार घेत आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत १९५४ रुग्ण आढळले असून त्यातील ११५४ रुग्ण स्वगृही परतले आहेत.

शहरातील राधास्वामी कॉलनी, भारतमातानगर, हर्सूल परिसर, शिवशंकर कॉलनी, आकाशवाणी परिसर, न्यायनगर, कैलासनगर, आंबेडकर, बीड बायपास रोड, गादियाविहार शंभूनगर, छावणीमधील तोफखाना,  वेदांतनगर, देवडीबाजार, जवाहर कॉलनीमधील बुद्धनगर, अल्तमश कॉलनी, पैठण गेट, गौतमनगर या भागात प्रत्येकी एकाला करोनाची बाधा झाली.

एन-११, एन-८, संजयनगर, भीमनगर भावसिंगपुरा नॅशनल कॉलनी आदी ठिकाणी दोन, तर रोशनगेट भागात पाच, उस्मानपुरा येथील पीरबाजारमध्ये तीन रुग्ण आढळून आले आहेत. कारागृहात एकाच वेळी २९ जण करोनाबाधित आढळले आहेत.

कारागृह बंद असताना लागण कशी?

करोना विषाणूची लागण तपासणीसाठी कारागृहातील ११० कैद्यांच्या लाळेचे नमुने तपासण्यात आले होते. त्यातील २९ जणांना लागण झाली आहे. कारागृह बंद असताना विषाणू पोहोचला कसा, याचा शोध घेण्यासाठी कोणत्या सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात कोणते कर्मचारी आले होते, हे तपासण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडाळकर यांनी सांगितले. शहरातील कारागृहाची क्षमता ५७९ एवढी असून सध्या औरंगाबादमधील हार्सूल करागृहात १८०० कैदी आहेत.

मृतांचा आकडा ९८ वर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये शनिवारी  तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा ९८ झाला आहे. चंपाचौक भागातील ह्रदयविकाराने ग्रस्त महिलेस करोनाची बाधा झाली होती. तसेच हर्सूल भागातील सवेरापार्क येथील ७० वर्षांचा पुरुष व किराडपुरा भागातील ५० वर्षांच्या महिला मृत्यू झाला. मधूमेह, उच्चरक्तदाब असे या रुग्णांना अन्य आजार होते. या मृत्यूमुळे घाटी रुग्णालयातील मतांची संख्या ७७ तर खासगी रुग्णालयात २० झाली आहे.