प्रदेशाध्यक्षांसह प्रमुख पुढाऱ्यांचा सहभाग

औरंगाबाद- भीमा-कोरेगावसारखी संवेदनशील प्रकरणे देशभर घडत आहेत. त्यामुळे जातीय संघर्ष विकोपाला जात आहे. यातून सामाजिक घडी विस्कटेल. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अराजकता पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. परभणी येथे ते लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते. या वेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, बालकिशन चांडक यांची उपस्थिती होती.

देशात भाजपशासित केंद्र आणि राज्य शासनांनी अराजकता माजवली आहे. देशातील अल्पसंख्याक, दलित, शेतकरी, व्यापारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भयमुक्त भारत निर्मितीसाठी काँग्रेसच्या वतीने मराठवाडय़ात सर्वत्र एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

भोकरच्या आमदार अमिता चव्हाण, परभणीत अशोक चव्हाण, औरंगाबाद येथे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, हिंगोलीत राजीव सातव, बीडमध्ये जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते. बहुतांश जिल्हय़ात गांधी पुतळय़ाजवळ हे आंदोलन करण्यात आले.

नांदेडमध्ये आमदार अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोिवदराव पाटील िशदे नागेलीकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आंदोलन केले.

या वेळी आमदार वसंतराव चव्हाण, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, माजी आमदार रोहिदास चव्हाण, रावसाहेब अंतापूरकर, महापौर शीलाताई भवरे, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंगोलीत भाजप सरकार आल्यापासून खोटे बोलण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहेत. शेतकऱ्यांसह सामान्यांच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असून, समाजासमाजात तेढ निर्माण करून देशात अशांतता पसरवण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे, अशी टीका खासदार राजीव सातव यांनी केली आहे.  आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

बीड येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. माजी खासदार रजनी पाटील, माजी आमदार सिराज देशमुख, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषणात सक्रिय सहभाग नोंदवला.