औरंगाबाद शहरातील करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ाहून अधिक आहे. मंगळवारी सकाळी औरंगाबादमधील विविध वसाहतींमध्ये ५५ नवे रूग्ण आढळले आहेत. औरंगाबादमध्ये मंगळवारी सकाळी ५५ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या १६४२ झाली आहे. आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या औरंगाबादमध्ये दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत १०४९ जणांना करोनावर मात केली आहे. औरंगाबादमध्ये ५१४ जणांनावर उपचार सुरू आहेत. ७९ जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या ५५ करोनाबाधितांमध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. येथील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित असलेल्या ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा एक जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६३, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये १ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ७९ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.


मंगळवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (1), किराडपुरा (2), चंपा चौक (1), कटकट गेट (1), नारळीबाग (1), गणेश कॉलनी (1), जवाहर नगर (3), भीम नगर (2), हमालवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), नाथ नगर (2), ज्योती नगर (1), फजलपुरा परिसर (1), मिल कॉर्नर (1), एन-3 सिडको (1), एमजीएम परिसर (1), रोशन गेट (1) , विशाल नगर, गारखेडा परिसर (1), एन-सहा संभाजी कॉलनी (7), समता नगर (5), अंहिसा नगर (1), मुकुंदवाडी (1), विद्या निकेतन कॉलनी (1), न्याय नगर (1), बायजीपुरा (2), संजय नगर, मुकुंदवाडी (4), विजय नगर (2), यशवंत नगर, पैठण (1), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (1), नेहरु नगर (1), जुना मोंढा नाका परिसर (1), अन्य (3) या भागातील कोरानाबाधित आहेत.

दुकाने उघडण्यास परवानगी?

नव्या टाळेबंदीत दुकाने उघडण्यासाठी अधिकचा वेळ  दिला जाईल. तसेच आवश्यक वस्तूंशिवाय इतरही दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळू शकते, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील दुकाने उघडण्यास शिथिलता असेल असे  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

आणखी एका पोलिसाला करोना

सिटी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याचा करोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी सकारात्मक आला. रशीदपुरा-गणेश कॉलनीतील रहिवासी असलेले संबंधित कर्मचारी मागील आठ-दहा दिवसांपासून ईदच्या सुटीवर होते. तीन दिवसांपूर्वी ते रुजू झाले. मात्र गुरुवारी त्यांनीच आपल्याला ताप व करोनाशी संबंधित लक्षणे जाणवत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. मात्र, ते ठाण्यातील कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. यापूर्वी औरंगाबाद पोलीस विभागातील १२ जण करोनाने बाधित झालेले असून त्यात दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे